चीनचा डाव होता गुप्तचर माहिती मिळवणं, भारतीय सैनिकांनी असं पळवून लावलं; वाचा तवांगची Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 05:20 PM2022-12-13T17:20:01+5:302022-12-13T17:32:09+5:30

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारतीय सैन्यानं चीनच्या आगळीकीला जशासतसं उत्तर दिलं. ९ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून कब्जा करण्याच्या इराद्यानं आलेल्या चीनी सैनिकांनी भारतीय जवानांनी नुसतं मागे ढकललं नाही, तर त्यांचा चांगला धडा देखील शिकवला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार भारतीय गुप्तचर विभागाला या आगळीकीचा संशय होताच. त्यामुळे चीनच्या या घुसखोरीला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय लष्करानं आधीच सर्व तयारी करुन ठेवली होती. याचा परिणाम असा झाला की भारतीय सैनिकांनी चीन सैन्याला पळवून लावलं.

इतकंच काय तर काही भारतीय सैनिक चीनी सैनिकांचा पाठलाग करत करत अगदी चीनच्या सीमेपर्यंत जाऊन पोहोचले होते. जाणून घेऊयात यासंपूर्ण घटनेची Inside Story...

भारतीय लष्कराला आधीपासूनच चीनच्या कुरापतीची पूर्वकल्पना प्राप्त झाली होती. भारतीय लष्करानं चीनच्या आगळीकीला उत्तर देण्यासाठी आधीच सर्व तयारी करुन ठेवली होती. अतिरिक्त कुमक संबंधित ठिकाणी हजर होती.

चीनचे ३०० सैनिक एलएसीवर यांगत्से येथे भारतीय पोस्टवर आले. त्यानंतर दोन्ही बाजूनं झटापट झाली. यात चीनी सैनिकांनी दगडफेकही केली. भारतीय जवानांनी तातडीनं अतिरिक्त कुमकला याबाबत सूचना दिली आणि ते तातडीनं घटनास्थळावर पोहोचले. यानंतर भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांनी पूर्णपणे घेरलं आणि प्रत्युत्तर दिलं.

भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना चांगला धडा शिकवला आणि मागे हटण्यास भाग पाडलं. काही चीनी सैनिकांना चांगलंच धुतलं. अनेकांचे गाल लालेलाल केले. भारतीय सैनिकांनाही किरकोळ जखमा झाल्या. एका सैनिकाचं मनगट फ्रॅक्चर झालं आहे.

भारतीय सैनिकांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि चीनी सैनिकांनी माघार घेण्यास सुरुवात केली. इथवरच भारतीय जवान थांबले नाहीत. पळ काढणाऱ्या चीनी सैनिकांचा भारतीय जवानांनी पाठलाग केला. त्यांना पळवून पळवून मारलं. काहींना तर पकडलं देखील. जवळपास ५० जणांची एक तुकडी पाठलाग करता करत चीनी सैनिकांच्या पोस्टवर देखील पोहोचली.

चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांना पाहताच हवेत गोळीबारही केला. यानंतर दोन्ही बाजूंनी लाउडस्पीकरच्या माध्यमातून घोषणा करत सावधानतेचा इशारा देण्यात आला. दोन दिवसांनी म्हणजेच ११ डिसेंबरला स्थानिक कमांडरनं चीनी समकक्ष अधिकाऱ्यासोबत फ्लॅग मिटिंग केली. चीननं प्रोटोकॉलचं पालन करावं असं कडक शब्दांत भारताकडून सांगण्यात आलं. तसंच कोणत्याही प्रकारे आम्हाला उकसवण्याचं काम केलं गेलं तर त्याचं जशास तसं उत्तर दिलं जाईल अशी वॉर्निंग भारतानं पेट्रोलिंग वेळी चीनी सैनिकांना दिली.

लष्कराच्या माहितीनुसार एलएसीत तवांग येथील सीमेबाबत दोन्ही देशांची वेगवेगळी धारणा आहे. २००६ पासून दोन्ही देशांकडून या जागेवर दावा केला जात आहे आणि दोन्ही देशांचे सैनिक पेट्रोलिंग करतात. गेल्या काही दिवसांपासून चीनी सैनिक एलएसीवर यांगत्सेजवळ अत्यंत आक्रमक भूमिका घेत आहे. संरक्षण सुत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही आठवड्यांमध्ये दोन ते तीन प्रसंग असे घडले की भारतीय सीमेत चीनचे ड्रोन पाहून हवाई दलानं आपले लढाऊ विमान तैनात केले होते. चीनला उत्तर देण्यासाठी सुखोई-३० लढाऊ विमान तैनात करण्यात आलं होतं.

९ डिसेंबर रोजी अरुणाचलच्या तवांग सेक्टरमध्ये भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये झटापट झाली. यात ३०० चीनी सैनिकांनी यांगत्से भागात भारतीय हद्दीत घुसून भारतीय पोस्ट हटवण्याचा प्रयत्न केला. चीनी सैनिकांच्या हातात मोठ्या लोखंडी काटेरी लाठ्या आणि काठ्या होत्या. भारतीय सैनिकांनी तातडीनं प्रत्युत्तर दिलं. सुत्रांच्या माहितीनुसार या झटापटीत चीनचे बरेच सैनिक जखमी झाले आहेत.