Arpita Mukherjee: अर्धा-अर्धा किलोच्या पाटल्या, त्यासोबत काळी डायरी; ईडीच्या हाती अर्पिताची अशी रहस्ये...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 03:13 PM2022-07-28T15:13:09+5:302022-07-28T15:29:06+5:30

Arpita Mukherjee: आतापर्यंत एकुण ५० कोटी रुपये अर्पिताच्या घरातून ईडीला मिळाले आहे. ईडीने अर्पिताला २३ जुलै रोजीच अटक केली आहे.

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती (West Bengal SSC Scam) घोटाळ्यामध्ये ममता बनर्जी सरकारमधील उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्ती अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरु आहे. अर्पिता मुखर्जी यांच्या कोलकात्यातील घरातून पुन्हा कोट्यवधी रुपयांचे घबाड जप्त करण्यात आलं आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी पुन्हा एकदा कोलकात्यात्याच्या आसपास तीन ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांत ईडीला अर्पिता मुखर्जीच्या बेलघरिया येथील आणखी एका फ्लॅटमधून सुमारे २९ कोटी रुपये रोख आणि ५ किलो सोने सापडले आहे.

विशेष म्हणजे, हे पैसे मोजण्यासाठी ईडीच्या चमूला तब्बल १० तास लागले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अर्पिताने हा पैसा फ्लॅटच्या टॉयलेटमध्ये लपवला होते.

गेल्या ५ दिवसांपूर्वी देखील ईडीला अर्पिताच्या एका फ्लॅटमधून २१ कोटी रुपये रोख आणि काही मौल्यवान वस्तू सापडल्या होत्या. त्यामध्ये अर्धा-अर्धा किलोच्या बांगड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत एकुण ५० कोटी रुपये अर्पिताच्या घरातून ईडीला मिळाले आहे. ईडीने अर्पिताला २३ जुलै रोजीच अटक केली आहे.

अर्पिताच्या घरातून ईडीला एक काळी डायरी देखील सापडली होती. सदर डायरी ही Department of Higher And School Education च्या संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. ही डायरी ४० पानांची असून यामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख आहे. ही डायरी शिक्षक भरती घोटाळाप्रकरणीचे अनेक रहस्य उलघडू शकते.

ईडीच्या अधिकाऱ्यांना पार्थ चटर्जी यांच्या घरातून क्लास सी आणि क्लास डी सेवाच्या भरतीतील उमेदवारांशी संबंधित कागदपत्रेही मिळाली आहेत. समोर आलेल्या पुरव्यांनुसार ग्रूप डी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीत पार्थ चटर्जी यांचा सक्रियपणे सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी ईडीच्या कबुलीजबाबात अर्पिता मुखर्जीने म्हटले आहे, की जप्त करण्यात आलेले सर्व पैसे पार्थ चॅटर्जी यांचेच आहेत. त्यांचेच लोक हे पैसे घेऊन येत होते. मिळालेल्या माहितीनुसार, अर्पिता मुखर्जी काल रात्रीपासून रडत आहे.

ईडीच्या चौकशीनंतर ती कोलमडली आहे. ती रात्री उशिरा झोपली असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही, तर आपण निर्दोष असून यासंदर्भात आपल्याला काहीही माहीत नाही. आपल्याला त्या खोलीत जाण्याची परवानगीही नव्हती, असेही अर्पिताने म्हटले आहे.

दरम्यान, ईडीच्या या कारवाईनंतर, विरोधी पक्ष आक्रमक झाला असून, विरोधी पक्षाने पार्थ चॅटर्जी यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही, तर शिक्षक भरती घोटाळ्यातील मनी ट्रेलची चौकशी करणाऱ्या ईडीने पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष तथा टीएमसी आमदार माणिक भट्टाचार्य यांचीही चौकशी केली आहे.