पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल
By सुनील पाटील | Published: May 23, 2024 09:36 AM2024-05-23T09:36:03+5:302024-05-23T09:37:58+5:30
पुण्यातील कारचालक अल्पवयीन असल्याने त्याच्या पालकांना आरोपी करण्यात आले. व्यक्ती कितीही मोठी असली तरी ती कायद्यापेक्षा मोठी नाही, हा संदेश यातून देण्यात आला. जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असताना एकाही मंत्र्याने रामदेववाडीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेतली नाही.
![Different justice for Pune, then why such injustice on Ramdevwadi The families of all the four deceased were evicted here | पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल Different justice for Pune, then why such injustice on Ramdevwadi The families of all the four deceased were evicted here | पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/asdhqgerer_2024051236062.jpg)
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल
जळगाव : पुण्यात बिल्डरच्या मद्यधुंद अल्पवयीन मुलाने दोन युवा अभियंत्यांना चिरडल्याच्या घटनेची खुद्द उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत पुण्यात येऊन पोलिस यंत्रणेची बैठक घेत घटनेचा आढावा घेतला. तेथे तत्काळ आरोपीला अटक झाली. जळगाव तालुक्यातील रामदेववाडीत मात्र अशाच एका घटनेत चारजणांचा जीव जाऊनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नाही. आरोपींना अटक तर सोडाच; दिलासा म्हणून कोणतीच मदत या कुटुंबांना अद्याप मिळालेली नाही. पुण्यात वेगळा न्याय आणि रामदेववाडीत वेगळा का? अशा संतप्त भावना गावकऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.
पुण्यातील कारचालक अल्पवयीन असल्याने त्याच्या पालकांना आरोपी करण्यात आले. व्यक्ती कितीही मोठी असली तरी ती कायद्यापेक्षा मोठी नाही, हा संदेश यातून देण्यात आला. जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असताना एकाही मंत्र्याने रामदेववाडीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेतली नाही.
जळगाव, पारोळ्यात घेतले रक्ताचे नमुने
- रामदेववाडीतील घटनेनंतर वाहनातील जखमी तरुणांना पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अर्णव अभिषेक कौल याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईला नेले.
- अखिलेश संजय पवार याचे जळगावात रक्ताचे नमुने घेण्यात आले, तर अर्णवला घेऊन जाणारी रुग्णवाहिका पारोळ्यात थांबवून तेथे रक्ताचे नमुने घेण्यात आले. दोघेही मुंबईत उपचार घेत आहेत.
अपघाताचा तपास आता डीवायएसपींकडे
अपघात प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक ए. सी. मनोरे यांच्याकडून काढून घेण्यात आला असून, तो डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ‘लोकमत’मध्ये बुधवारी प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तडकाफडकी तपास अधिकारी बदलला. या घटनेत अर्णव अभिषेक कौल हा कार चालवीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती डीवायएसपी संदीप गावित यांनी ‘लोकमत’ला दिली.