Vidhan Parishad Election:...तर भाजपाचे प्रसाद लाड जिंकणार; देवेंद्र फडणवीसांची खेळी यशस्वी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 06:24 PM2022-06-20T18:24:04+5:302022-06-20T18:26:59+5:30

राज्यसभेच्या निकालात भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिसला. या निवडणुकीत संख्याबळ नसतानाही भाजपाने तिसरा उमेदवार निवडून आणला. त्यामुळे विधान परिषदेतही हाच कल कायम राहणार का? अशी चर्चा आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने ५ उमेदवार उभे केले आहेत. त्यात भाजपाचे प्रसाद लाड हे अतिरिक्त उमेदवार आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी सहा उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

या निवडणुकीच्या मतदानात भाजपाने पहिल्या ४ उमेदवारांना पहिल्या पसंतीची ३० मते देण्यात आल्याची माहिती आहे. जर भाजपाने ही रणनीती वापरली असेल तर प्रसाद लाड यांना अतिरिक्त मतांचा कोटा ट्रान्सफर होईल.

या निवडणुकीत २८५ मतदारांनी मतदान केले. त्यात भाजपाची एकूण १०६ उमेदवार आणि काही मित्रपक्ष पकडून पक्षाच्या ४ उमेदवारांना पहिल्या पसंतीची ३० मते घेतली आहेत. त्यामुळे प्रसाद लाड यांना १६ मते ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे.

जर देवेंद्र फडणवीस यांची ही खेळी यशस्वी ठरली तर प्रसाद लाड यांना निवडून येण्यासाठी ७ मतांची गरज भासेल. राज्यसभेचा निकाल पाहिला तर भाजपानं अतिरिक्त ९ ते १० मते घेण्यास यश मिळवले होते.

मात्र विधान परिषदेत गुप्त मतदान असल्याने महाविकास आघाडीतील नाराजीचा फटका मतदानात बसेल असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे ही नाराजी भाजपाच्या पथ्यावर पडेल का? हे निकालातून दिसणार आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत भाजपाने ५ उमेदवार उभे केले होते. तर महाविकास आघाडीकडून ६ उमेदवार रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत पाहायला मिळत आहे.

परंतु महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीलाही दुसऱ्या उमेदवारांचा मतांचा कोटा पूर्ण करण्यास ४-५ मतांची गरज होती. सूत्रांनुसार राष्ट्रवादीनं पहिल्या पसंतीची २९ मतांचा कोटा निश्चित केल्याचं पुढे आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागलं होते.

या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी काँग्रेसनं भाजपाचे उमेदवार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. जगताप, मुक्ता टिळक यांनी मदतनीसाच्या माध्यमातून हे मत दिले असा आक्षेप काँग्रेसनं घेतला

मात्र राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून आम्ही रितसर लेखी परवानगी घेतली होती. त्यामुळे काँग्रेसनं घेतलेला आक्षेप बालिशपणाचा आहे. या प्रकरणात राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचा आक्षेप फेटाळला. त्यामुळे निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे.