उदय सामंतही 'निघाले'! शिवसेनेकडे आदित्य ठाकरेंसोबत मोजकेच आमदार उरले; कोण कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 04:42 PM2022-06-26T16:42:19+5:302022-06-26T18:15:00+5:30

Eknath Shinde's Revolt: काहीही असले तरी या साऱ्या बंडामध्ये काही आमदार शिवसेनेच्या मुंबईतील बैठकांना उपस्थित होते. परंतू ते हळू हळू मुंबईहून सूरत आणि तिथून गुवाहाटीला जाऊ लागले.

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत यादवी सुरु झाली आहे. हे सारे अनपेक्षित होते. काँग्रेस आमदार फुटले अशा बातम्या रात्रीच्या सुमारास येत असताना त्याच वेळी महाराष्ट्र, गुजरातच्या सीमेवर मोठ्या घडामोडी सुरु होत्या. एकनाथ शिंदे निम्मी शिवसेना म्हणजेच २० ते २५ आमदार घेऊन सूरतेकडे निघाले होते.

यापैकी कैलास पाटील हे शिंदे गटाच्या तावडीतून निसटले. याच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात असल्या तरी आता ते शिवसेनेत परतले आहेत. आमदार सावंत यांच्या दाव्यानुसार पाटील यांनीच त्यांना सूरतला नेले होते. परंतू वाटेतून त्यांचा विचार बदलला आणि ते माघारी परतले.

दुसरे आमदार नितीन देशमुख यांनी सूरतमध्ये त्यांच्यावर बळजबरी झाल्याचा आरोप केला आहे. देशमुख यांना पोलिसांनी पकडले आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्यांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या स्टोरीवरही शिंदे गटाने खुलासा केला आहे. देशमुखांना आम्ही चार्टर्ड प्लेनने नागपुरात सोडल्याचे ते म्हणतात.

काहीही असले तरी या साऱ्या बंडामध्ये काही आमदार शिवसेनेच्या मुंबईतील बैठकांना उपस्थित होते. परंतू ते हळू हळू मुंबईहून सूरत आणि तिथून गुवाहाटीला जाऊ लागले. अशाप्रकारे शिंदे गटाचे संख्याबळ वाढत गेले. आम्ही शिवसेनेसोबतच, वेळ आल्यास जीव देऊ वगैरेच्या बाता मारणारे आमदारही आता गुवाहाटीला गेले आहेत.

अशातच आज कोकणातील आमदार आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत देखील सूरतमार्गे गुवाहाटीला निघाले आहेत. असे असताना आता शिवसेनेत कोण कोण उरलेत? असा प्रश्न अनेकांना उपस्थित होत आहे.

आता शिवसेनेत मंत्री म्हणून आदित्य ठाकरेच उरले आहेत. आता शिवसेनेने ज्या १६ आमदारांवर कारवाई केलीय, त्यांच्याकडील मंत्री पदे काढून घेऊन राहिलेल्या आमदारांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

उदय सामंतांच्या पलायनानंतर आणखी कोण कोण गुवाहाटीला जाऊ शकतात? कोण कोण मुंबई आणि महाराष्ट्रात उरलेत याची चर्चा सुरु झाली आहे.

कोकणातील आमदार आणि जायंट कीलर समजले जाणारे वैभव नाईक शिवसेनेतच आहेत. भास्कर जाधवही अद्यापतरी महाराष्ट्रात असल्याचे समजते. यानंतर सूरत आणि गुवाहाटीहून परतलेले कैलास पाटील, नितीन देशमुख महाराष्ट्रात आहेत.

शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवून अजय चौधरी यांना गटनेता केले आहे. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि माजी महापौर आणि मुंबईतील आमदार सुनील प्रभू शिवसेनेसोबत आहेत.

यानंतर उदयसेन राजपूत, राहुल पाटील, प्रतोद भरत गोगावले, संतोष बांगर, संजय पोतनीस देखील अद्याप महाराष्ट्रात आहेत. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत देखील अद्याप मुंबईत आहेत. आता हे आमदार तरी इथे राहतील का? की गुवाहाटीला पोहोचतील हे सांगणे कोणालाच शक्य नाहीय.