Coronavirus: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन होणार? केंद्रानं राज्याला केलं अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 07:49 AM2021-08-01T07:49:57+5:302021-08-01T07:56:23+5:30

संसर्गदर 10% पेक्षा जास्त तिथे अत्यंत कडक निर्बंध! केंद्र सरकारची सूचना; महाराष्ट्रासह १० राज्यांना केले सावध

देशातील ४६ जिल्ह्यांत संसर्गदर १० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने तिथे अत्यंत कडक निर्बंध लागू करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वा संसर्गदर वाढत असलेल्या महाराष्ट्रासह १० राज्यांनी साथ आटोक्यात आणण्यासाठी कठोर पावले उचलावी, असेही केंद्राने म्हटले.

केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी दहा राज्यांची बैठक घेऊन तेथील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. या राज्यांमध्ये केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, ओदिशा, आसाम, मिझोराम, मेघालय, आंध्र प्रदेश, मणिपूर यांचाही समावेश आहे.

ईशान्य भारतामध्ये कोरोनाचा झपाट्याने होणारा फैलाव धोकादायक असून तो नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने तेथील राज्यांनाही काही सूचना केल्या आहेत.

सध्याच्या स्थितीत निष्काळजीपणा दाखविल्यास त्यामुळे खूप मोठे नुकसान सोसावे लागेल, असा सावधानतेचा इशाराही केंद्राने राज्यांना दिला आहे.

केंद्र सरकारने म्हटले आहे की, महाराष्ट्रासह दहा राज्यांत उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांपैकी अनेक जण घरात विलगीकरणामध्ये आहेत. प्रत्येक राज्याने स्वत: जिल्हानिहाय सिरो सर्वेक्षण करावे.

४५ ते ६० वर्षे तसेच ६० वर्षे वयोगटातील लोकांच्या कोराना लसीकरणाचा वेग राज्यांनी वाढवावा. कारण याच वयोगटातील लोकांना कोरोनाचा जास्त त्रास सहन करावा लागला आहे.

तयारीचा आढावा - गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात दररोज ४० हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. ही स्थिती चांगली नाही.

कोरोनाचा सर्वाधिक फैलाव झालेल्या ४६ जिल्ह्यांमधील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, उपलब्ध लसींची संख्या, रुग्णशय्या, व्हेंटिलेटर आदी सुविधांचा केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला.

चाचण्यांचा वेग वाढवा - केंद्राने राज्यांना सांगितले की, देशातील अन्य ५३ जिल्ह्यांमध्ये संसर्गदर ५ ते १० टक्क्यांमध्ये आहे. त्या जिल्ह्यांतील कोरोना चाचण्यांचा वेग वाढवावा. तिथे वेळीच नीट लक्ष न दिल्यास स्थिती आणखी गंभीर होऊ शकते असा इशारा केंद्राने दिला.

केरळमधील कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या मदतीला केंद्र सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोल या संस्थेतील सहा तज्ज्ञांचे पथक पाठविले आहे. एकट्या केरळमध्ये कोरोनाचे ३३ लाख रुग्ण आहेत.