निकषात न बसणाऱ्या बहि‍णींना बाहेर काढण्यासाठी प्लॅन; अंगणवाडी सेविकांसह RTOवर जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 19:44 IST2025-03-22T19:21:39+5:302025-03-22T19:44:16+5:30

Ladki Bahin Yojana: अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्जाची पडताळणी सुरू आहे. यासाठी काही निकष लावले जात आहेत.

लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वांत लोकप्रिय योजनेपैकी एक आहे. या योजनेअतंर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. मात्र, या अनेक अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे.

अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्जाची पडताळणी सुरू आहे. यासाठी काही निकष लावले जात आहेत.

५ एकर शेतीपेक्षा जास्त शेती त्यांच्या नावावर नको. तसेच जर ती महिला शासकीय नोकरीत असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाभार्थी असलेल्या महिलांच्या नावावर जर चारचाकी वाहन असेल तर ती महिला प्रथम त्यातून वगळली जाणार आहे.

'या' बहिणींना पैसे मिळणार नाहीत- लाडक्या बहीण योजनेचा लाभघेणाऱ्या महिलांच्या एकत्रित अथवा विभक्त कुटुंबात पती किंवा सासऱ्यांच्या नावावर चारचाकी वाहन असेल तर त्यांना फटका बसणार आहे. घरात दोघांपैकी कोणाकडेही चारचाकी असल्यास महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

आगामी काळात अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन चारचाकी वाहनांची तपासणी केली जाणार आहे.

आयकर भरणाऱ्यांनाही योजनेचा लाभ नाही- लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या महिलांसाठी आहे. मात्र, जास्त उत्पन्न असलेल्या आणि आयकर भरत असलेल्या महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अर्जाची पडताळणी होणार आहे. त्यानुसार आयकर भरणाऱ्या महिलांना यातून वगळले जाणार आहे. पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

अंगणवाडीसेविकांसह आरटीओकडे जबाबदारी- लाभार्थीच्या घरोघरी जाऊन कोणत्या लाभार्थी महिलेच्या घरात कार आहे अथवा इतर बाबींची तपासणी केली जाणार आहे.

कारबाबतची तपासणी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सूचना केल्या असून, आरटीओकडे असलेल्या नोंदणीचाही त्यासाठी वापर करून घेतला जाईल.