By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:13 IST
1 / 5विजय वडेट्टीवार, नाना पटोले, भास्कर जाधव यांनी अशोक खरात प्रकरणावरून विधानसभेत संताप व्यक्त केला. आमदारांनी या विषयावर भाष्य केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या वतीने निवेदन केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'विरोधी पक्षाच्या वतीने जो मुद्दा इथे उपस्थित झाला आहे. भोंदू बाबा अशोक खरातचा विषय घडला आहे. तो गंभीर आहे. या व्यक्तीने तथाकथित शक्तींचा दुरुपयोग करून, अनेक महिलांसोबत गैरव्यवहार, दुष्कृत्य केल्याचे समोर येत आहे.'2 / 5'मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की, यासंदर्भातील कारवाई आपल्या पोलिसांनी केलेली आहे. त्याचा ट्रॅप तयार करून ती केलेली आहे. यामध्ये महिलांचा समावेश असल्याने, त्याची फसवणूकच झाली होती. पण, त्या समोर यायला तयार नव्हत्या. त्यामुळे त्यांना योग्य पद्धतीने धीर देऊन, काही महिलांनी तक्रार केलेली आहे. उर्वरित काही महिला यासंदर्भात तक्रार करतील', असे फडणवीस यांनी सांगितले.3 / 5'मी इतकंच सांगेन की, कारवाई जरी आता झाली, तरी याची तयारी पूर्वीपासूनच सुरू होती. त्याच्या अटकेच्या अगोदरच १० मार्च रोजी दुसऱ्या जिल्ह्यातील एका तक्रारीचा उपयोग करून त्याचा एलओसी देखील काढला होता, जेणेकरून त्याला बाहेर पळता येऊ नये. त्यामुळे यासंदर्भात पूर्णपणे कारवाई आपण करतो आहोत. मी या सभागृहात उद्या सविस्तर निवेदन करेन. कारण आजही याची चौकशी सुरू आहे', अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली.4 / 5'दोन्ही बाजूंना माझी विनंती आहे की, हा कोणासाठीच राजकारणाचा प्रश्न नाहीये. हा महिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे. अशा प्रकारे महिलांचा दुरुपयोग करणे. त्यांना काहीतरी वेगळं भासवून, त्यांना काहीतरी शक्ती आहेत, असे सांगून; त्या जे समर्पण करताहेत, ते करणेच त्यांचे इतिकर्तव्य आहे, अशा पद्धतीने त्यांचे ब्रेशवॉशिंग करणे. अशा अनेक गोष्टी यात करण्यात आलेल्या आहेत', असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. 5 / 5क्लीन चिटच्या मुद्द्याचा विरोधी बाकांवरून उल्लेख करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मी नेहमी क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो, त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाहीये. आणि याच्यात ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्याला सोडलं जाणार नाही.'