Ajit Pawar : 'काय झाडी, काय डोंगर'वरुन अजित पवारांची तुफान फटकेबाजी, म्हणाले...'अहो शहाजीबापू!'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 01:03 PM2022-07-04T13:03:58+5:302022-07-04T13:20:41+5:30

Ajit Pawar: राज्याच्या विधानसभेत बहुमत चाचणीत शिंदे सरकार उत्तीर्ण झालं असलं तरी चर्चा झाली ती अजित पवारांच्या भाषणाची!

राज्याच्या विधानसभेत आज बहुमत चाचणी घेण्यात आली आणि यात १६४ आमदारांच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे सरकार चाचणीत यशस्वी झालं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांची भाषणं झाली. पण सगळ्यात चर्चा झाली ती अजित पवारांच्या तुफान फटकेबाजीची.

अजित पवारांनी आपल्या अनोख्या शैलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बंडखोर आमदारांवर जोरदार फटकेबाजी केली. यावेळी शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या व्हायरल डायलॉगची भुरळ अजित पवारांनी पडली.

शहाजी बापू पाटील यांच्या 'काय झाडी, काय डोंगर' या डायलॉगचा उल्लेख करत अजित पवारांनी विधानसभेत जोरदार भाषण केलं. "ते शहाजी बापू तिथं काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल एकदम Ok Ok करत बसले", असं अजित पवार म्हणाले.

त्यापुढे अजित पवार म्हणाले की, "अहो शहाजी बापू पाटील तुम्हाला एकच सांगणं आहे ही मोठी माणसं कधी काय निर्णय घेतील काही सांगता येत नाही. त्यामुळे जरा सांभाळून". अजित पवारांनी शहाजी बापूंचा डायलॉग म्हणून दाखवताच विधानभवनात एकच हशा पिकला.

अजित पवार यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावर मिश्किल टिप्पणी केली. "फडणवीसांच्या आजच्या भाषणात आधीसारखा जोश दिसला नाही. त्यांना मी याआधी अनेदका विधानसभेत बोलताना पाहिलं आहे. पण आज त्यांच्यात आधीसारखा जोश दिसत नव्हता", असं अजित पवार म्हणाले आणि एकच हशा पिकला.

ज्यांनी ज्यांनी आजवर शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला ते कधीच पुन्हा निवडून आलेले नाहीत हा देखील इतिहास आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा जनतेत जाल तेव्हा खरी परीक्षा असणार आहे, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांनी यावेळी फडणवीसांना खोचक टोला लगावताना गेल्या अडीच वर्षांत त्यांना मिळालेल्या पदांचा उल्लेख केला. "सर्वात नशिबवान कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्याचं कारण म्हणजे सभागृहाची अडीच वर्षच झाली आहे. अडीच वर्षं बाकी आहेत. या अडीच वर्षांत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले,उपमुख्यमंत्रीही झाले आणि विरोधी पक्ष नेतेही झाले. कुठलं पद भुषवायचं सोडलं नाही", असा चिमटाही अजित पवार यांनी काढला.

"एकनाथ शिंदेंचं समर्थन करता मग तुमच्या मंत्रिमंडळात फक्त रस्ते विकास महामंडळ खातंच का दिलं?" अशी विचारणा देखील अजित पवार यांनी यावेळी केली.

"भाजपाने शिवसेनेसोबत राहून त्यांची ताकद वाढवली. प्रत्येक जण आपआपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचं काम करत असतो. आघाडी असली तरी एकनाथ शिंदे त्यांच्या गटाची ताकद वाढवण्यावर भर देतील, देवेंद्र फडणवीस त्यांचा पक्ष वाढवण्यावर भर देतील" असं देखील अजित पवार यांनी म्हटलं.

अजित पवारांनी आपल्या रांगड्या शैलीत भाषण केलं आणि सत्ताधाऱ्यांना चिमटे काढले खरे, पण यात सर्वाधिक चर्चा त्यांनी शहाजीबापूंच्या डॉयलॉगची कॉपी केली याचीच झाली. अजित पवारांच्या डायलॉगबाजीनं सभागृहात काहीकाळ हलकंफुलकं वातावरण तयार झालं होतं.

अजित पवारांनी यावेळी ते उपमुख्यमंत्री असताना त्यांच्यावर निधी वाटपावरुन होणाऱ्या आरोपांचंही आकडेवारी मांडत स्पष्टीकरण दिलं. सर्वांना समान वागणूक देण्याचं काम केल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले. राज्यातील २८८ आमदारांना समान महत्व दिल्याचं ते म्हणाले.