Sri Lanka Crisis : लंका तर सोन्याची होती, मग पैशा पैशासाठी का तरसली? डोईवर ५१ अब्ज डॉलर्सचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 09:06 AM2022-05-11T09:06:28+5:302022-05-11T09:26:45+5:30

Sri Lanka Crisis : गेल्या काही दिवसांत श्रीलंकेच्या रुपयाचं मूल्य ८० टक्क्यापेक्षा अधिक पडलं आहे. यापूर्वी श्रीलंकेत एका डॉलरचं मूल्य २०१ श्रीलंकन रुपये होतं, आता ते ३६० श्रीलंकन रुपयांवर गेलं आहे.

Sri Lanka Crisis : भारताचा शेजारी देश आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या श्रीलंकेत मोठा हाहाकार उडाला आहे. महागाई एवढी वाढली आहे की, लोकांनी गुरुवारी रात्री श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करताच जमाव हिंसक झाला. एवढी भीषण अवस्था कशी आली, सोन्याची लंका म्हणता म्हणता ती एवढी कंगाल कशी झाली, कोणी या छोट्याशा देशाची एवढी भयाण अवस्था केली.

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेची अर्थव्यवस्था दोन वर्षांपूर्वीपर्यंत दक्षिण आशियातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था मानली जात होती. २०१९ मध्ये, कोरोना महासाथ येण्यापूर्वी जागतिक बँकेनं श्रीलंकेला जगातील उच्च मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या श्रेणीत अपग्रेड केलं होतं. परंतु अवघ्या दोनच वर्षात श्रीलंकेची अर्थव्यवस्छा मोठ्या प्रमाणात जमिनीवर आदळली.

श्रीलंकेला आता परकीय कर्जाची परतफेड करता आली नाही. इतकंच नाही तर त्यांनी स्वतःला दिवाळखोर घोषित केले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, श्रीलंकेतील चलनवाढीचा दर आता १७ टक्क्यांच्या पुढे गेला आहे, जो संपूर्ण दक्षिण आशियातील कोणत्याही देशातील महागाईचा सर्वात वाईट स्तर आहे.

गेल्या काही दिवसांत श्रीलंकन ​​रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ८० टक्क्यांहून अधिक घसरले आहे. मार्चमध्ये श्रीलंकेत १ डॉलरची किंमत २०१ श्रीलंकन ​​रुपये होती, जी आता ३६० श्रीलंकन ​​रुपयांवर आली आहे. श्रीलंकेचे सरकारी आकडे दर्शवतात की एप्रिल २०२१ पर्यंत, श्रीलंकेवर एकूण ३५ अब्ज डॉलरचं विदेशी कर्ज होते, जे एका वर्षात ५१ अब्ज डॉलर्स इतके झालं आहे.

श्रीलंकेकडे पैशाची इतकी तीव्र टंचाई निर्माण झाली आहे की, श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेला आपल्याजवळ ठेवलेले निम्मे सोने विकावे लागले आहे. २०२१ च्या सुरुवातीला श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेकडे ६.६९ टन सोन्याचा साठा होता, त्यापैकी ३.६ टन सोन्याची विक्री करावी लागली आहे.

२०१८ मध्ये श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा ७.५ बिलियन डॉलर्स होता, तो फेब्रुवारी २०२२ मध्ये २.३१ बिलियन डॉलर्सवप घसरला. परकीय चलन वाचवण्यासाठी श्रीलंका सरकारने मार्च २०२० मध्ये विदेशी आयातीवर बंदी घातली होती, परंतु त्याचाही विशेष परिणाम झाला नाही. याउलट, विदेशी आयातीवर बंदी घातल्याने श्रीलंकेत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला होता.

जेव्हा श्रीलंका सरकारने परदेशी आयातीवर बंदी घातली तेव्हा रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला, त्यानंतर सरकारने संपूर्ण श्रीलंकेत सेंद्रिय शेती अनिवार्य केली. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांकडे वळल्यामुळे अन्न उत्पादनावर वाईट परिणाम झाला. सरकारच्या या निर्णयामुळे श्रीलंकेचे कृषी उत्पादन निम्म्यावर आले आहे. विदेशी आयात आणि सेंद्रिय शेतीवरील निर्बंधांमुळे श्रीलंकेत मालाचा तुटवडा निर्माण झाला आणि किमती इतक्या अनियंत्रित झाल्या की श्रीलंकेत आर्थिक आणीबाणी आली.

रीलंकेच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा १० टक्क्यांहून अधिक आहे. श्रीलंकेसाठी परकीय चलनाचा हा तिसरा सर्वात मोठा स्त्रोत आहे. श्रीलंकेच्या पर्यटन क्षेत्रात ५ लाख श्रीलंकन नागरिक ​​प्रत्यक्ष आणि २० लाख अप्रत्यक्षपणे गुंतलेले आहेत. श्रीलंकेला पर्यटनातून दरवर्षी ५ अब्ज डॉलरची कमाई होते. कोरोनामुळे श्रीलंकेतील पर्यटनावर मोठा परिणाम झाला आणि त्यामुळे परकीय चलन साठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली.

सेंट्रल बँक ऑफ श्रीलंकेनुसार, सध्या श्रीलंकेवर एकूण ५१ अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज आहे. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, श्रीलंकेवरील विदेशी कर्जाची रक्कम एकूण जीडीपीच्या १०४ टक्के आहे. परदेशी कर्जाचे हप्ते भरण्यासाठी श्रीलंकेला पुढील १२ महिन्यांत ७.३ अब्ज डॉलर्सची गरज आहे, तर २६ अब्ज डॉलर पुढील चार वर्षांत म्हणजे २०२६ पर्यंत कर्जाच्या हप्त्याच्या रुपात भरायचे आहेत.

श्रीलंकेतील लोक राजेपाक्षे सरकारविरोधात नाराज आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून श्रीलंकेवर याच कुटुंबाचे राज्य आहे. राजेपाक्षे कुटंबाचे चार भाऊ मिळून राज्य करत आहेत. त्यांच्यावर निरंकुश शासक असल्याचे गंभीर आरोप होत आहेत. या चार भावांनीच देशाची अर्थव्यवस्था कंगाल केल्याचे म्हटले जात आहे.

राजपक्षे कुटुंबाने श्रीलंकेच्या प्रादेशिक राजकारणात सुरुवात केलेली. २००५ मध्ये महिंदा राजपक्षे यांची देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. यानंतर राजपक्षे कुटुंबातील लोकांनीच सत्तेतील महत्वाची पदे काबीज केली. धाकटे भाऊ आणि तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांची संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती केली. बासिल राजपक्षे यांची राष्ट्रपतींचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली.

परिवारवाद आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे महिंदा राजपक्षे यांचा २०१५ च्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाला. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी पुन्हा सत्ता मिळविली. गोटाबाया राजपक्षे राष्ट्रपती झाले. महिंदा राजपक्षे पंतप्रधान झाले. बासिल राजपक्षे अर्थमंत्री आहेत तर चमल राजपक्षे कृषि मंत्री. एवढेच नाही तर महिंदा यांचा मुलगा नमल युवा आणि क्रीडा मंत्री आहे. एकूण ७ लोक सत्तेत आहेत.