Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:28 IST2025-05-07T16:23:14+5:302025-05-07T16:28:37+5:30
Operation Sindoor In Pakistan: दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्याला भारतीय लष्कराने ७ मे रोजी उत्तर दिले. मध्यरात्री भारताने असे उत्तर दिले की दहशतवाद्यांची, त्यांना संरक्षण देणाऱ्या पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांची झोपच उडाली. पाकिस्तानी नागरिक या हल्ल्याने इतके भांबावले की घरं सोडून पळाले.

२२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी निशस्त्र पर्यटकांना गाठले आणि निर्दयीपणे हत्या केल्या. या हल्ल्याचा जबाब भारतानेही त्याच भाषेत दिला. भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांची सुरक्षित ठिकाणेच उडवली.
ज्यावेळी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर क्षेपणास्त्र डागली. त्यानंतर मोठे स्फोट झाले. या स्फोटाच्या आवाजाने नागरी वस्त्यातील लोकही हादरून गेले.
पाकव्याप्त काश्मिरातील मुजफ्फराबादमध्ये राहणाऱ्या शहनवाज याने बीसीसीला सांगितले की, "आम्ही घरांमध्ये गाढ झोपलेलो होतो. त्याचवेळी स्फोटांचा आवाज आला. त्यामुळे आम्ही हादरलो. आम्ही आमच्या कुटुंबासह, महिला आणि मुलांसह बाहेर पळालो. आता आम्ही सुरक्षित जागेचा शोध घेत फिरत आहोत."
मोहम्मद शाहीर याने रॉयटर्सला सांगितले की, "या हल्ल्यानंतर आम्ही घाबरलो आणि घरातून पळून जाऊन मोकळ्या जागेत थांबलो. काही शेजारी डोंगराच्या शेजारी गेले. आम्ही तब्बल चार तास असेच तिथेच बसून होतो."
"सूर्योदय झाल्यानंतर आम्ही गावातील लोक त्या हल्ला झालेल्या ठिकाणी गोळा झाले. त्यानंतर पोलीस आले", असे त्याने सांगितले.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, जेव्हा हल्ला त्यानंतर आवाज आला. ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आला, त्यावेळी इतका मोठा स्फोट झाला की असं वाटलं सूर्य उगवला आहे." दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने सीमेवरील भारतीय गावांना लक्ष्य करत केलेल्या हल्ल्यात दहा नागरिकांचा मृत्यू झाला. तर ५० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली.