अजित डोवाल यांचं एक पाऊल अन् पाकिस्तानात उडाली खळबळ! पडद्यामागून नेमकं काय घडतंय? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 03:47 PM2023-02-12T15:47:44+5:302023-02-12T15:51:42+5:30

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतल्याची पाकिस्तानात जोरदार चर्चा होत आहे. बुधवारी डोवाल रशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. यात डोवाल यांनी अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरुन झालेल्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत सहभाग घेतला.

पाकिस्तान अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर स्वत:ला अग्रस्थानी समजतो आणि डोवाल यांच्या सहभागामुळे पाकला मिरची झोंबली आहे. याच मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय संबंधांच्या विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार भारत मोठ्या हुशारीनं पाकिस्तानचा अफगाणिस्तानमधील हस्तक्षेप कमकुवत करण्याचं काम करत आहे. भारताचे परराष्ट्रीय संबंधांचे डावपेच पाकिस्तानला भारी पडत आहेत.

रशियाची राजधानी मॉक्सोमध्ये अफगाणिस्तामधील शांती आणि स्थिरतेच्या मुद्द्यावरुन पाचवी बैठक झाली. या बैठकीत चीन, भारत, इराण, तझाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, उज्बेकिस्तानसह आणखी काही देशांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आलं होतं.

रशियाची राजधानी मॉक्सोमध्ये अफगाणिस्तामधील शांती आणि स्थिरतेच्या मुद्द्यावरुन पाचवी बैठक झाली. या बैठकीत चीन, भारत, इराण, तझाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, उज्बेकिस्तानसह आणखी काही देशांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आलं होतं.

भारतानं यंदा आपल्या बजेटमध्ये अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी विशेष पॅकेजची तरतूद केल्याचीही माहिती डोवाल यांनी रशियातील बैठकीत दिली. तसंच अफगाणिस्तानातील विकास कामांसाठी भारत २.५ कोटी डॉलर खर्च करणार असल्याचंही सांगितलं. भारताच्या याच भूमिकेमुळे पाकिस्तानला मोठं नुकसान होत असल्याचं बोललं जात आहे.

अफगाणिस्तान मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एनएसएची ही पाचवी बैठक होती. या बैठकीत पाकिस्तानचा मुद्दा अतिशय हुशारीनं निकाली काढण्यात आला. आज पाकिस्ताननं अशी परिस्थिती निर्माण केली आहे की सर्व देश एकत्र येऊन अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर बोलत आहेत. पण आपण काहीच करत नाहीय असं पाकिस्तानला वाटू लागलं आहे. एकेकाळी अफगाणिस्तानमध्ये आपण मोठे हिस्सेदार होतो पण आता परिस्थिती बदलली आहे असं पाकिस्तानला कळून चुकलं आहे, असं पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे विश्लेषक कमर चीमा यांनी म्हटलं आहे.

अफगाणिस्तान मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जेव्हा पहिली बैठक बोलावण्यात आली होती. तेव्हा ती भारतात घेण्यात आली होती आणि त्यावेळी पाकिस्ताननं यात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यावेळी पाकिस्तानात इमरान खान यांचं सरकार होतं आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी भारतात येण्यास नकार दिला होता. आता परिस्थिती अशी झाली आहे की राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे पाकिस्तानात एनएसएचं पदच रिकामी आहे.

चीमा यांच्या म्हणण्यानुसार भारताला आता पाकिस्तानची कमकुवत बाजू चांगली लक्षात आली आहे. ते म्हणाले की, "एनएसए डोवाल पाकिस्तानला चांगलं ओळखून आहेत. पाकला कोणत्या पद्धतीनं उत्तर द्यायचं हे त्यांना समजलं आहे. अफगाणिस्तानात आपण काय केलं पाहिजे याची उत्तम रणनिती भारतानं आखलेली दिसते. अफगाणिस्तानातील समस्या सोडवण्यासाठी पाकिस्तानची गरजच भासणार नाही अशी परिस्थिती निर्माण करणं ही रणनिती आहे. यात आता इतर देशही पाठिंबा देत आहेत"

पाकिस्तानातील राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानकडे सध्या अफगाणिस्तानबाबतीत कोणतीही रणनिती तयार नाही पाकिस्ताननं स्वत:ला उद्ध्वस्त तर केलंच, पण अफगाणिस्तानची देखील वाट लावली आहे. आता भारतानं अमेरिकेसमोर दावा केला आहे की अफगाणिस्तानातील समस्याचं निराकरण करण्याची ताकद आमच्याकडे आहे.