अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 13:09 IST2025-04-21T13:04:01+5:302025-04-21T13:09:01+5:30

Non Nuclear Hydrogen Bomb: गेल्या काही काळापासून सातत्याने लष्करी शक्ती वाढवत असलेल्या चीनमधून भारतासह संपूर्ण जगाची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. चीनने एक शक्तिशाली नॉन न्यूक्लियर हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली आहे. या बॉम्बमुळे जगभरातील शस्त्रास्त्र स्पर्धेला नवं वळण लागण्याची शक्यता आहे.

गेल्या काही काळापासून सातत्याने लष्करी शक्ती वाढवत असलेल्या चीनमधून भारतासह संपूर्ण जगाची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. चीनने एक शक्तिशाली नॉन न्यूक्लियर हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली आहे. या बॉम्बमुळे जगभरातील शस्त्रास्त्र स्पर्धेला नवं वळण लागण्याची शक्यता आहे.

हा बॉम्ब मॅग्नेशियम हायड्राइड नावाच्या एका स्थायूरूप हायड्रोजन सामुग्रीचा वापर करतो. त्यामुळे तो परंपरागत विध्वंसक अण्वस्त्रांपेक्षा वेगळा आहे. हा नॉन न्यूक्लियर हायड्रोजन बॉम्ब पारंपरिक अणुबॉम्बपेक्षा वेगळा आहे. यामध्ये अणुविखंडन किंवा फिशन रिअॅक्शन होत नाही. तसेच या बॉम्बमुळे आंतरराष्ट्रीय अणुकराराचं उल्लंघनही होत नाही.

चिनी संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार हा बॉम्ब अगदी कमी खर्चामध्ये विकसित करता येतो. तसेच या बॉम्बपासून फारसा किरणोत्सर्गही होत नाही. मात्र या बॉम्बच्या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे आता चीनकडे अणुबॉम्बपेक्षा धोकादायक असं भयंकर हत्यार लागलं आहे.

हा बॉम्ब स्फोट झाल्यानंतर १००० डिग्री सेल्सियसहून अधिक तापमानाचा आगीचा गोळा तयार करतो. तो सर्वसाधारण टीएनटी स्फोटाच्या तुलनेत १५ पट अधिक वेळेपर्यंत टिकतो.

या बॉम्बचं वजन केवळ २ किलो असून, कमी आकार असूनही तो मोठ्या प्रमाणावर हानी घडवून आणतो. तसेच या बॉम्बच्या स्फोटामुळे कुठलाही किरणोत्सर्ग होत नाही. त्यामुळे हा बॉम्ब अणुबॉम्बच्या तुलनेत वेगळा ठरतो.

आता चीनसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे चीन या हत्याराचा वापर सीमाभागात करू शकतो. त्यामुळे या बॉम्बचा भारताला मोठा धोका आहे. दुसरीकडे चीनने आपल्या लष्करी सामर्थ्याला एआय, ड्रोन स्वार्म, हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आणि नॉन न्यूक्लियर रणनीतिक हत्यारांनी सज्ज करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतालाही आपल्या शस्त्र क्षमतेची तुलना चीनसोबत करून आगेकूच करावी लागेल.