चीन उभारतोय जगातील सर्वात मोठे धरण; भारतावर होणार परिणाम, पृथ्वीचा वेगही मंदावणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 15:52 IST2024-12-26T15:42:26+5:302024-12-26T15:52:47+5:30

China Hydropower Dam: या धरणाद्वारे वार्षिक 300 अब्ज KWH वीज निर्मिती करण्याचे चीनचे उदिष्ट आहे.

China Hydropower Dam: भारताचा शेजारील देश किती प्रगत आहे, याचा अंदाज तेथील तंत्रज्ञान आणि विविध पायाभूत सुविधा पाहून लावता येतो. चीनने आतापर्यंत एकापेक्षा एक महाकाय पायाभूत सुविधा उभाल्या आहेत. आता चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे. जिनपिंग सरकारने या सर्वात मोठ्या जलविद्युत धरणास मान्यता दिली आहे. तिबेट पठाराच्या पूर्व भागात चीन आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करणार आहे. याचा परिणाम भारत आणि बांग्लादेशातील लाखो लोकांवर होऊ शकतो.

2020 मध्ये चीनच्या पॉवर कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, यारलुंग झांगबो नदीच्या खालच्या स्तरावर बांधण्यात येत असलेल्या या धरणाची वार्षिक 300 अब्ज KWH वीज निर्मिती करण्याची क्षमता असेल. सध्या मध्य चीनमध्येच उभारलेल्या जगातील सर्वात मोठ्या थ्री गॉर्जेस धरणाची क्षमता 88.2 अब्ज KWH आहे. पण, आता नवीन धरणाची क्षमता यापेक्षा 3 पट जास्त असेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकल्पामुळे चीनचे कार्बन पीकिंग आणि कार्बन न्यूट्रॅलिटी लक्ष्ये पूर्ण करण्यात, तसेच अभियांत्रिकीसारख्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तिबेटमध्ये नोकरीच्या संधी निर्माण करण्यात मदत होईल. दरम्यान, यारलुंग झांगबो नदीचा भाग 2,000 मीटर (6,561 फूट) उंचीवर 50 किमी (31 मैल) अंतरावर आहे. यामुळे हा जलविद्युत प्रकल्प उभारणे चीनसाठी मोठे आव्हान असणार आहे.

हे धरण बांधण्यासाठी 34.83 अब्ज डॉलर्स (सुमारे 3000 अब्ज रुपये) खर्च येईल, ज्यामध्ये धरणामुळे विस्थापित झालेल्या 14 लाख लोकांचे पुनर्वसनदेखील समाविष्ट आहे. दरम्यान, या प्रकल्पामुळे तिबेटमधील किती लोक विस्थापित होतील आणि जगातील सर्वात समृद्ध आणि वैविध्यपूर्ण पठारावरील स्थानिक पर्यावरणावर त्याचा काय परिणाम होईल, हे अधिकाऱ्यांनी अद्याप सांगितलेले नाही.

तिबेटमधून उगम पावणारी यारलुंग झांगबो नदी भारतात ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखली जाते. ही भारतातील अरुणाचल प्रदेश आणि आसाम राज्यातून दक्षिणेकडे बांग्लादेशकडे वाहते. चिनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तिबेटच्या जलविद्युत प्रकल्पाचा त्याचा पर्यावरणावर कोणताही विशेष परिणाम होणार नाही किंवा त्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार नाही. असे असतानाही भारत आणि बांग्लादेशने या धरणाबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली आहे. या प्रकल्पामुळे केवळ स्थानिक पर्यावरणावरच परिणाम होणार नसून नदीच्या प्रवाहावरही परिणाम होण्याची भीती आहे.

काही रिपोर्ट्सनुसार, या धरणामुळे अनेक घातक परिणाम होऊ शकतात. या धरणामुळे पर्यावरणाची हानी तर होईलच, पण भूकंप आणि पुराचा धोकाही निर्माण होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. नासाचे शास्त्रज्ञ बेंजामिन फोंग चाओ यांनी चीनच्या थ्री गॉर्जेस धरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर, तसेच ग्रहाच्या स्थितीवर परिणाम होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला होता. आता चीन थ्री गॉर्जेस धरणाच्या तिप्पट क्षमतेचे धरण बांधत असल्याने त्याचा परिणाम आणखी मोठा असू शकतो.