लडाखनंतर अरुणाचलमध्ये चीनची नवीन चाल; भारताचं टेन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 02:56 PM2020-11-09T14:56:58+5:302020-11-09T15:04:52+5:30

गेल्या 9-10 महिन्यांपासून चीन कोणत्या ना कोणत्या मार्गाने भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. लडाखमधील सीमा वादात आंतरराष्ट्रीय स्तरावर वाईटरित्या मात झाल्यानंतर आता चीन भारतील लोकांना आणि सरकारला त्रास देण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहे.

चीन आता भारतीय सीमेजवळ रस्ता, रेल्वे आणि हवाई संपर्क वाढवत आहे. आता चीन एक नवीन चाल खेळणार आहे, ज्यामुळे पुन्हा तणाव वाढण्याची अपेक्षा आहे. ब्रह्मपुत्र नदीवर चीन नवीन धरण बांधत आहे.

या धरणाच्या बांधकामामुळे अरुणाचल प्रदेश आणि आसपासच्या राज्यात समस्या उद्भवतील. कारण हे धरण भारतीय सीमेपासून अगदी जवळ बांधले जाणार आहे. हे धरण ज्या भागात बांधले जाईल ते म्हणजे ब्रह्मपुत्र नदीचे खालचे क्षेत्र. म्हणजेच येथे पाण्याचा प्रवाह खूप वेगवान आहे.

असेही बोलले जात आहे की, हे धरण चीनच्या सर्वात मोठ्या तीन-जॉर्ज धरणाच्या बरोबरीचे असेल म्हणजेच त्याची उंची सुमारे 181 मीटर असेल आणि लांबी सुमारे 2.33 किलोमीटर असेल.हे धरण बांधले जाईल, असे चीनने नुकतेच जाहीर केले आहे. मात्र, चीनने अद्याप आपले बजेट जाहीर केले नाही.

बीसीफोकस डॉट कॉमच्या वृत्तानुसार, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरून चीन भारताशी वाद घालत आहे. त्यामुळे चीन या राज्याला भारतीय मानतही नाही. तज्ज्ञांच्या मते, चीनही या धरणाचा उपयोग रणनीतिकदृष्ट्या करू शकतो.

चीन सरकारने ब्रह्मपुत्र नदीवर 11 जलविद्युत प्रकल्प तयार केले आहेत, त्याला तेथील यारलंग सांगपो म्हणतात. या धरण व प्रकल्पांमुळे नदी प्रवाहात असामान्य बदल घडून आले आहेत. चीन आपल्या मर्जीने हवे त्या वेळी या धरणाचे दरवाजे उघडते आणि बंद करते.

भारताच्या ईशान्येकडील राज्यांना पावसाळ्याच्या दिवसात जास्तीत जास्त त्रास सहन करावा लागतो. अरुणाचल प्रदेश, आसामसह अनेक राज्यांना पूराचा सामना करावा लागतो.

यारलंग सांगपो म्हणजेच ब्रह्मपुत्र नदी चीनमधून वाहत तिबेटमार्गे अरुणाचल प्रदेशातून भारतात येते. यानंतर ही नदी आसाममार्गे बांगलादेशकडे जाते. चीनमधील बहुतेक जलविद्युत प्रकल्प तिबेटी प्रदेशात येतात. या नदीच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवून चीन भारतातील उत्तर-पूर्व राज्यांना त्रास देत नाही तर कोरड्या भागालाही सिंचन करते.

ब्रह्मपुत्र नदीवर चीनमध्ये येणाऱ्या11 विद्युत प्रकल्पांपैकी जांगमू हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. याची सुरुवात सन २०१५ मध्ये झाली होती. एवढेच नाही तर चीनने तिबेटच्या सुमारे सात शहरांमध्ये जलविद्युत प्रकल्प तयार केले आहेत किंवा तयार करणार आहे.

बायू, जिशी, लांग्टा, दाप्का, नांग, डेमो, नाम्चा आणि मेतोक ही सात शहरे आहेत. चीन गेल्या दहा वर्षांपासून ब्रह्मपुत्र नदीवर सातत्याने उर्जा प्रकल्प आणि धरणे बांधत आहे.