Coronavirus Vaccine: भारताच्या ‘Covaxin' लशीला मोठं यश; पहिल्या चाचणीचा टप्पा सुरक्षित पार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 01:39 PM2020-08-14T13:39:57+5:302020-08-14T13:43:49+5:30

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जगातील वैज्ञानिक लस शोधण्याचा प्रयत्न दिवसरात्र करत आहेत. रशियाने कोरोनावरील लस आणल्याची घोषणा केली मात्र त्यांच्या लसीवर इतर देशांनी शंका उपस्थित केली आहे.

जगातील अन्य देशांप्रमाणे भारतातही कोरोना लस शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी भारत बायोटेक-आयसीएमआरद्वारे कोवाक्सिन नावाची लस तयार करण्यात आली आहे. याच्या पहिल्या क्लिनिकल चाचणीचा रिपोर्ट आता आला आहे.

भारतात कोविड -१९ लसीच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी(Corona Vaccine Human Trial) यशस्वी झाली आहे. चाचणीच्या सुरुवातीच्या निकालात असं म्हटलं आहे की, ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. भारत बायोटेक आणि जायडस कॅडिला लसीची मानवी चाचण्या सहा शहरांमध्ये सुरू आहेत.

कोरोनाव्हायरस लशीची तपासणी भारतातील १२ शहरांमधील ३७५ स्वयंसेवकांवर करण्यात आली. प्रत्येक स्वयंसेवकांना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. आता त्यांचे परीक्षण केले जात आहे.

पीजीआय रोहतक येथे सुरू असलेल्या चाचणीची टीम लीडर सविता वर्मा म्हणाली, ही लस सुरक्षित आहे. आम्ही ही लस सर्व स्वयंसेवकांना दिल्यापासून त्यांच्यावर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. स्वयंसेवकांना आता दुसरा डोस देण्याची तयारी सुरू आहे. त्याआधी तपासकर्ते स्वयंसेवकांच्या रक्ताचे नमुने गोळा करीत आहेत, त्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी या लसीच्या रोगप्रतिकारक शक्तीची चाचणी घेईल.

सविता वर्मा म्हणाल्या, आता आम्हाला समजले की ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. आता दुसर्‍या टप्प्यात आपण लस किती प्रभावी आहे हे शोधून काढू. त्यासाठी आम्ही रक्ताचे नमुने घेणे सुरू केले आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली येथील प्रमुख तपासकर्ते संजय राय म्हणाले, 'ही लस सुरक्षित आहे' एम्स (AIIMS) येथे भारत बायोटेक लसीची चाचणी घेण्यासाठी १६ स्वयंसेवकांना दाखल करण्यात आले आहे.

सुरक्षित कोरोना विषाणूची लस बनविण्याच्या या शर्यतीतही भारत सहभागी आहे. सरकार स्वतः या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे. कोवाक्सिन ही भारताची पहिली लस आहे आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या सहकार्याने भारत बायोटेकने विकसित केली आहे.

सर्व १२ ठिकाणांहून सुरक्षिततेचे निकाल पाहिल्यानंतर आता कंपनी दुसर्‍या टप्प्यात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे संपर्क करेल. दुसर्‍या वैज्ञानिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जर सर्व काही ठीक झाले तर पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ही लस उपलब्ध होईल.

त्यामुळे जगभरातील कोरोना लस बनवण्याच्या स्पर्धेत भारतही कुठे मागे नाही. रशियाने कोरोना लसीची घोषणा केली असली तर अद्याप त्या लशीला जागतिक मान्यता मिळाली नाही. अमेरिका-चीन यांच्याकडून लसीची चाचणी सुरु आहे. त्यामुळे लवकरच लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

Read in English