Coronavirus Third Wave Peak: देशात केव्हा संपुष्टात येणार कोरोनाची तिसरी लाट? समोर आली माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 09:14 PM2022-01-15T21:14:28+5:302022-01-15T21:21:08+5:30

देशात सध्या कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. मुंबई आणि दिल्लीत दैनंदिन पातळीवर हजारो रुग्ण आढळून येत आहेत. तिसरी लाट नेमकी केव्हा संपुष्टात येणार?

देशात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच मुंबई आणि दिल्ली कोरोना विस्फोटाचे केंद्र बनले आहेत. पण यातून आपली केव्हा सुटका होणार याबाबत एक आश्वासक माहिती समोर आली आहे.

आयआयटी कानपूरचे (IIT Kanpur) प्राध्यापक मनींद्र अग्रवाल (Professor Manindra Agarwal) यांनी गणितीय मॉडलच्या आधारावर कोरोनाची लाट केव्हा संपुष्टात येईल याचा अंदाज व्यक्त केला आहे.

आणखी एक महिना कोरोनाचा कहर आपल्याला पाहायला मिळेल. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्या सर्वोच्च आकडा गाठेल. त्यानंतर १५ फेब्रुवारीपासून नव्या रुग्णांच्या संख्येत घट होण्यास सुरुवात होईल.

मुंबई आणि दिल्लीत पुढच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळेल असं प्राध्यापक मनींद्र अग्रवाल म्हणाले. ज्या वेगानं कोरोनाची तिसरी लाट पसरली त्याच वेगानं रुग्णसंख्येत घट होतानाही दिसेल, असंही ते म्हणाले.

दोन्ही शहरांमध्ये या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येईल. यादरम्यान, देशात दैनंदिन पातळीवर ८ लाखाहून अधिक रुग्णसंख्या गाठेल. त्यानंतर कोरोनाचा कहर कमी होण्यास सुरुवात होईल.

मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत तिसरी लाट संपुष्टात येईल असा दावा त्यांनी केला आहे. ज्या शहरांमध्ये सध्या रुग्णसंख्या कमी आढळून येत आहे अशा शहरांमध्ये येत्या काही आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या वाढू शकते. पण मुंबईत रुग्णसंख्येनं सर्वोच्च आकडा गाठला आहे. अशीच परिस्थितीत दिल्लीतही आहे, असंही अग्रवाल म्हणाले.

कोरोना आणि निवडणूकीची पार्श्वभूमी पाहता कोरोना अशा शहरांमध्ये पसरतोय जिथं निवडणुकीसाठी गर्दी झालेली दिसत नाही. तरीही कोरोनापासून बचावासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर यालाच सर्वाधिक महत्त्व देण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.