Coronavirus: कोरोनाची चौथी लाट धडकणार?: BHU च्या रिपोर्टनं टेन्शन वाढलं; केवळ १७ टक्के लोक सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 03:29 PM2022-04-21T15:29:25+5:302022-04-21T15:35:30+5:30

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोविड बाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर कोविडची मार्गदर्शक तत्त्वे जवळपास संपूर्ण देशातून संपुष्टात आणली आहेत. मास्कसक्ती कुठेही नाही.

मात्र पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे निर्बंधांची भीती अधिकच वाढली आहे. BHU जीवशास्त्रज्ञांनी एक सेरो सर्वेक्षण केले आहे ज्या अंतर्गत ११६ लोकांचे नमुने घेण्यात आले आहेत. या सर्वेक्षणात अतिशय धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

सर्वेक्षणात केवळ १७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर केवळ १५ टक्के लोकांनाच बुस्टर डोस मिळाला आहे. सेरो सर्वेक्षणाच्या आधारे, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की जर ७० टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये अँटीबॉडीज संपले तर कोरोनाचे आकडे वाढू शकतात.

काशी हिंदू विद्यापीठातील जीवशास्त्राचे प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे यांनी १० सर्वेक्षण केले आहेत. याअंतर्गत ११६ जणांचे नमुने घेण्यात आले. या नमुन्यात समोर आलेल्या आकडेवारीनुसार केवळ १७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत.

४६ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज जवळजवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. प्राध्यापक चौबे म्हणाले की, जर ७० टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये अँटीबॉडीज संपले तर कोरोनाचा आकडा वाढण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत, दुसऱ्या डोसनंतर बुस्टर डोस वाढवणं आवश्यक आहे.

जानेवारी २०२२ पासून कोविड लसीच्या बुस्टर डोसची सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात, हा डोस ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना, फ्रंटलाइन कामगारांना, सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिला जात होता. वाराणसीच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, सुमारे ४ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही वाराणसीमध्ये बूस्टर डोसची गती खूपच कमी आहे.

लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लोकांची संख्या सुमारे ७६ टक्के आहे. त्याच वेळी, बूस्टर डोस घेत असलेल्या लोकांची संख्या केवळ १५ टक्के मर्यादित आहे. १२ ते १८ या वयोगटातील मुलांचेही लसीकरण सुरू झाले आहे. तर १८ वर्षावरील लोकांना बूस्टर डोस दिला जात आहे.

आकडेवारीनुसार, ७७ टक्क्यांहून अधिक मुलांचे लसीकरण झाले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीत आणि सेरो सर्वेक्षणाच्या आकडेवारीत दिसणाऱ्या समानतेनुसार या विभागाला बूस्टर डोस देण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.

देशातील रुग्णसंख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला असून पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही असा इशारा एक्सपर्ट्स देत आहेत. सध्या लोकांना कोरोनाशी संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे.

देशात बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे २,०६७ रुग्ण आढळले; तर ४० जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी असलेल्या नव्या रुग्णांपेक्षा ही संख्या दुप्पट आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. मंगळवारी १,२४७ नवे रुग्ण आढळले होते व एकाचा मृत्यू झाला होता.