दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
By कोमल खांबे | Updated: June 20, 2025 11:52 IST2025-06-20T11:10:27+5:302025-06-20T11:52:30+5:30
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का? सायली संजीवने मांडलं मत

सध्या महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या युतीची प्रचंड चर्चा आहे. एकत्र येण्याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सध्या तरी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने शिवसैनिक आणि मनसैनिक खूश आहेत. तर, असं झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर अभिनेत्री सायली संजीवने तिचं मत व्यक्त केलं आहे.
सायलीला राजकारणात प्रचंड रस आहे. ती राज ठाकरेंच्या महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेची उपाध्यक्षा आहे. सायलीने 'आम्ही असं ऐकलंय' या पॉडकास्टमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीवर मत मांडलं आहे.
सायली म्हणाली, "याबाबतीत सध्या मला काय वाटतंय हे मला कळत नाहीये. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या हितासाठी जे आहे ते या राज्यातील सगळ्या नेत्यांनी करावं. राज ठाकरेही नेहमी हेच म्हणतात".
"एखादी डेव्हलपेंट महाराष्ट्रात होते तेव्हा मला आनंद होतो. जेव्हा जेव्हा एखादा विकास घडतो, तेव्हा खरंच बरं वाटतं. महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे".
"फॉरेनच्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडतात. त्या आपल्याकडे आल्या की आपल्याला आनंद होतो. आपल्याकडे मेट्रोचा फायदा अनेकांना झाला आहे. या गोष्टी होत राहिल्या पाहिजेत".
"म्हणून मग माझं म्हणणं आहे की कोणीही एकत्र आलं की मला आनंद होईल. फक्त महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे".
"मला असं वाटतं की त्या दोघांनाही हेच वाटतं की महाराष्ट्राचा विकास व्हावा", असंही सायली पुढे म्हणाली.