एकटेच खेळत होते चिमुकले; चोरांनी अख्खे घरदार लुटले, पण जाताना...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 11:10 AM2021-01-28T11:10:27+5:302021-01-28T11:16:07+5:30

Crime News : दिल्लीच्या रोहिणी सेक्टरमध्ये 35 एक खळबळजनक आणि तेवढीच हृदयद्रावक घटना घडली आहे. दोन चिमुकल्यांची संशयितरित्या हत्या करण्यात आली आहे.

दिल्लीच्या रोहिणी सेक्टरमध्ये 35 एक खळबळजनक आणि तेवढीच हृदयद्रावक घटना घडली आहे. दोन चिमुकल्यांची संशयितरित्या हत्या करण्यात आली आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह बुधवारी सकाळी घराच्या आत सापडले. घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. दोन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आले आहेत.

सुरुवातीच्या तपासात या दोन्ही मुलांचा गळा आवळण्यात आल्याचे समोर आले आहे. पोस्टमार्टेमचा अहवाल आल्यावर हत्येचा प्रकार समोर येणार आहे.

यामध्ये सहा वर्षांचा पूरव आणि 4 वर्षांचा अभी यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या वडिलांचे याच भागात डेअरीचे दुकान आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून गुन्ह्याची उकल केल्याचा दावा केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मुले आई-वडिलांसोबत राहत होती. पूरव शाळेत जात होता. तर अभीसाठी शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्याचे पालक प्रयत्न करत होते.

त्यांच्या पालकांचा मदर डेअरी नावाचा बूथ आहे. सकाळी या मुलांचे आई-वडील बुथवर गेले होते. काही तासांनी ते परत घरी आले तेव्हा खोलीमध्ये दोन्ही मुले झोपलेली पाहिली.

मात्र, काही वेळ निघून गेला तरीही दोघांपैकी एकाचीही हालचाल झाली नसल्याचे पाहून त्यांच्या आईला संशय आला. दोघांनाही खूप वेळ उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना काही जाग आली नाही.

यामुळे काळजीने आई-वडिलांनी हंबरडा फोडला. आवाज ऐकून शेजारीही धावले. दोन्ही मुलांना महर्षि वाल्मिकी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली.

नातेवाईकांनी सांगितले की, घरातील कपाटे उघडी होती. यात ठेवलेले लाखोंचे दागिने गायब आहेत. जेव्हा चोर घरात घुसले तेव्हा पुरवला जाग आली असेल. त्याने आरोपींना पाहिले असेल त्यामुळे त्या चोरांनी त्याचा गळा आवळला असेल.

त्यानंतर अभीला जाग आली असेल. त्याचाही त्या चोरांनी गळा आवळून खून केला असेल, असा संशय व्यक्त केला आहे.

सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपींनी याचा फायदा घेतला. ज्या प्रकारे चोरी करण्यात आली त्यावरून पोलिसांना संशय आहे की, ते चोर आजुबाजुच्या परिसरातीलच असायला हवेत.