अनावश्यक कॉल्सची कटकट कायमची संपणार? टेलिकॉम कंपन्यांना बसणार दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:55 IST2025-01-07T15:52:28+5:302025-01-07T15:55:56+5:30
Telecom News : टेलिकॉम कंपन्यांसाठी मोठी बातमी आली आहे. आता कंपन्यांवर दंड आकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता टेलिकॉम कंपन्यांवर दंड आकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने (TRAI) दूरसंचार विभागाच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

यापुढे अनावश्यक कॉल्सबाबत नियमांचे पालन न केल्यास कंपन्यांवर दंड आकारला जाऊ शकतो. दूरसंचार विभाग लवकरच कंपन्यांना नोटीस जारी करू शकतो.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) दूरसंचार कंपन्यांना १५३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती आहे. वास्तविक, टेलिकॉम कंपन्या अनावश्यक कॉल्स थांबवण्यात अपयशी ठरल्या आहेत.

कंपन्यांनी अद्याप दंडाची रक्कम भरलेली नाही. ट्रायने दूरसंचार विभागाला कंपन्यांच्या बँक गॅरंटी जप्त करण्याची शिफारस केली होती. दूरसंचार विभागाने ट्रायकडून अनेक मुद्द्यांवर मत मागवले होते. ट्राय यांनी डिसेंबरमध्येच उत्तर पाठवले होते.

सध्या अनावश्यक कॉलसाठी केवळ टेलिकॉम कंपन्याच जबाबदार आहेत. नवीन वर्षात टेलिमार्केटिंग कंपन्यांनाही जबाबदार धरण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता टेलिमार्केटिंग कंपन्या रडारवर आल्या आहेत.

















