'या' शहरात सर्वात स्वस्त मिळतात टोमॅटो; फक्त ४० रुपये किलो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 09:40 PM2023-08-10T21:40:14+5:302023-08-10T22:11:09+5:30

महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

नवी दिल्ली : देशभरातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे. विशेषत: टोमॅटोच्या महागलेल्या भावाने सरकारलाही अडचणीत आणले आहे. रस्त्यापासून संसदेपर्यंत केवळ टोमॅटोच्या वाढत्या किमतीची चर्चा होत आहे.

दरम्यान, महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तरीही टोमॅटोचा दर दोन महिन्यांपूर्वी होता, तितका अद्याप झाला नाही. अजूनही अनेक शहरांमध्ये टोमॅटो १५० ते १८० रुपये किलोने विकले जात आहेत. मात्र, अनेक शहरांमध्ये टोमॅटोचा दर काहीसा स्वस्त झाला आहे.

सध्या देशात सर्वात स्वस्त टोमॅटो आसाममध्ये विकला जात आहे. आसाममधील बारपेटा येथे एक किलो टोमॅटोचा भाव ४० रुपये आहे. अशा परिस्थितीत आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकही टोमॅटो खरेदीसाठी येथे येत आहेत.

याचबरोबर बारपेटा नंतर सर्वात स्वस्त टोमॅटो पंजाबच्या रोपरमध्ये विकला जात आहे. रोपरमध्ये एक किलो टोमॅटोची किंमत ४१ रुपये आहे. मात्र, पंजाबची राजधानी चंदीगडमध्ये आजही टोमॅटो १४० रुपये किलो दराने मिळतात.

याशिवाय, स्वस्त टोमॅटोच्या बाबतीत जम्मू-काश्मीर तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजधानी श्रीनगरमध्ये एक किलो टोमॅटोची किंमत ६३ रुपये आहे. अशा परिस्थितीत आजूबाजूच्या शहरांमधून आणि गावातील लोकही टोमॅटो खरेदी करण्यासाठी श्रीनगरमध्ये येत आहेत.

विशेष म्हणजे एकाच राज्यात टोमॅटोच्या दरात मोठी तफावत आहे. तर जम्मूमध्ये टोमॅटो १६७ रुपये किलो दराने विकले जात आहेत. मात्र, जम्मूच्या तुलनेत कुपवाडामध्ये टोमॅटोचा दर खूपच कमी आहे. येथे टोमॅटोचा भाव ९२ रुपये किलो आहे.

श्रीनगरनंतर हरयाणातील पंचकुलामध्ये सर्वात स्वस्त टोमॅटो विकले जात आहेत. येथे एक किलो टोमॅटोचा भाव ९० रुपये आहे. येत्या काही दिवसांत टोमॅटोचे भाव आणखी घसरतील, असे येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, हरयाणातील सर्व जिल्ह्यांमध्ये टोमॅटोचे दर सारखे नाहीत.