इतिहासाचं वर्तुळ पूर्ण होणार? रतन टाटा खास मिशनवर; स्पेशल १२ अधिकारी लागले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 08:39 PM2021-09-14T20:39:05+5:302021-09-14T20:43:43+5:30

टाटा समूह लवकरच मोठा व्यवहार करण्याच्या तयारीत; रतन टाटा ऐतिहासिक कामगिरी करणार

उद्योग विश्वातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्त्व असलेल्या रतन टाटांनी नवं मिशन हाती घेतलं आहे. मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत अनेक वस्तू, उत्पादनं तयार करणारा टाटा समूह लवकरच इतिहासाचं वर्तुळ पूर्ण करू शकतो. त्यासाठीची तयारी रतन टाटांनी सुरू केली आहे.

टाटा समूहाला आपल्या नेतृत्त्वानं वेगळी दिशा देणारे रतन टाटा सध्या ८३ वर्षांचे आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर हातून गेलेली एक मोठी कंपनी परत मिळवण्याचा प्रयत्न टाटांनी सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी आपली स्पेशल टीम कामाला लावली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून संकटातून जात असलेली एअर इंडिया विकत घेण्यासाठी टाटा समूहानं कंबर कसली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक कंपन्या सरकारनं ताब्यात घेतल्या. एअर इंडिया त्यापैकीच आहे. एअर इंडियाचं आधीचं नाव टाटा एअरलाईन्स होतं. मात्र सरकारनं ही कंपनी ताब्यात घेत तिचं एअर इंडिया असं नामकरण केलं.

जेआरडी टाटांनी सुरू केलेली कंपनी अचानक सरकारनं काढून घेतली. त्याबद्दल जेआरडींनी नाराजीदेखील व्यक्त केली. टाटांनी जन्माला घातलेली टाटा एअरलाईन्स (आताची एअर इंडिया) पुन्हा टाटा समूहात समाविष्ट करण्यासाठी रतन टाटांनी कंबर कसली आहे.

टाटा समूहानं एअर इंडियाच्या अधिग्रहण प्रक्रियेसाठी आपल्याकडे असलेल्या सर्वोत्तम १२ जणांची नियुक्ती केली आहे. या डझनभर अधिकाऱ्यांवर अधिग्रहणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

२०१८ मध्ये केंद्र सरकारनं एअर इंडियातील हिस्सा विकण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. मात्र त्यावेळी कोणीही हिस्सा विकत घेण्यात रस दाखवला नाही. त्यानंतर गेल्या वर्षी सरकारनं एअर इंडिया पूर्णपणे विकण्याचा प्रस्ताव आणला. त्यावेळी टाटा समूहानं रस दाखवला.

टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन आणि समूहाचे सीईओ सौरभ अग्रवाल यांच्या नेतृत्त्वाखालील टीम एअर इंडियाचं मूल्यांकन करत आहे. एअर इंडियाचं नेमकं बाजारमूल्य किती याची मोजणी सध्या केली जात आहे. बोली लावण्याआधी स्पेशल टीम एअर इंडियाचं मूल्य प्रत्येक दृष्टीकोनातून तपासून पाहत आहे.

एअर इंडियावर सध्या असलेलं कर्ज, त्यांची मालमत्ता, खर्च-उत्पन्न अशी सगळी आकडेवारी टाटा समूहातल्या स्पेशल टीमनं गोळा केली आहे. ६८ वर्षांपूर्वी हातून गेलेली कंपनी पुन्हा मिळवण्यासाठी टाटा समूहानं पूर्ण जोर लावला आहे.

एअर इंडियाच्या खरेदीसाठी रतन टाटांनी तयार केलेल्या स्पेशल टीमचं नेतृत्त्व टाटा सन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष निपुण अग्रवाल करत आहेत. या टीममध्ये टीसीएस, टाटा रिऍल्टी एँड इन्फ्रा, टाटा स्टील, एअर एशिया इंडिया आणि विस्ताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे.

एअर इंडियाची संपत्ती, कंपनीवर असलेलं कर्ज यांचं योग्य मूल्यांकन करण्यासाठी टाटा समूहानं सहा जागतिक सल्लागार नियुक्त केले आहेत. यात सॅन फ्रान्सिस्कोपासून सिंगापूरपर्यंतच्या कंपन्यांचा समावेश आहे.