Car FASTag नं सरकारला केलं मालामाल! थेट ५० हजार कोटींची झाली कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 03:52 PM2023-01-25T15:52:10+5:302023-01-25T16:03:29+5:30

National Highways Authority of India: फास्टॅगमुळे टोलनाक्यांवरील वाहनांच्या रांगा काहीशा प्रमाणात कमी झाल्या आहेत. तर दुसरीकडे यामुळे सरकारचीदेखील मोठी कमाई झालीये.

गाड्यांवर लावलेल्या फास्टॅगच्या माध्यमातून प्रवाशांना लांबच लांब लागणाऱ्या रांगांपासून काहीशा प्रमाणात मुक्तता मिळाली. त्याचबरोबर सरकारलाही यातून भरपूर कमाई झाली आहे. 2022 मध्ये, फास्टॅगद्वारे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे एकूण टोल संकलन 46 टक्क्यांनी वाढून 50,855 कोटी रुपये झाले आहे.

यामध्ये राज्य महामार्गांवरील टोलनाक्यांचाही समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली. याच्या एक वर्ष आधी म्हणजे 2021 मध्ये फास्टॅगच्या माध्यमातून टोल प्लाझावर एकूण 34,778 कोटी रुपयांची टोलवसुली करण्यात आली होती.

NHAI ने एका निवेदनात म्हटले आहे की FASTag वरून डिसेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझावर दैनंदिन सरासरी टोल संकलन 134.44 कोटी रुपये होते आणि 24 डिसेंबर 2022 रोजी सर्वाधिक एक दिवसाचे संकलन 144.19 कोटी रुपये होते.

निवेदनानुसार, फास्टॅग व्यवहारांची संख्या देखील वार्षिक आधारावर 2022 मध्ये सुमारे 48 टक्क्यांनी वाढली आहे. 2021 आणि 2022 मध्ये ही संख्या अनुक्रमे 219 कोटी आणि 324 कोटी रुपये होती.

NHAI ने सांगितले की आतापर्यंत 6.4 कोटी FASTags जारी केले गेले आहेत आणि FASTag द्वारे शुल्क आकारणाऱ्या टोल प्लाझांची संख्या देखील 2021 मध्ये 922 वरून 1,181 (323 राज्य महामार्ग प्लाझांसह) वाढली आहे. FASTag च्या मदतीने, टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे कारण शुल्क भरण्यासाठी टोल बूथवर थांबण्याची आवश्यकता नाही.

सरकारने 16 फेब्रुवारी 2021 पासून सर्व खाजगी आणि व्यावसायिक वाहनांसाठी FASTag अनिवार्य केले आहे. ज्या वाहनांकडे वैध किंवा सध्याचा FASTag नाही अशा वाहनांना टोल शुल्काच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून भरावी लागते.