LIC पुन्हा संकटमोचक! सरकारने विक्रीस काढलेल्या रेल्वे कंपनीची खरेदी केली हिस्सेदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 09:19 PM2021-03-26T21:19:30+5:302021-03-26T21:25:20+5:30

LIC and RVNL: भारतीय आयुर्विमा निगम म्हणजेच LIC ने पुन्हा एकदा तारणहार ठरले असून, भारतीय रेल्वेचा एक भाग असलेल्या रेल विकास निगम म्हणजेच RVNL या कंपनीची मोठी हिस्सेदारी खरेदी केली आहे. (lic purchase stake of indian railway company rvnl)

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा निगम म्हणजेच LIC ने पुन्हा एकदा संकटमोचकाची भूमिका पार पाडली आहे. भारतीय रेल्वेच्या एका कंपनीची हिस्सेदारी खरेदी करून त्या कंपनीला तारले आहे. या कंपनीतून केंद्र सरकार आपली हिस्सेदारी विकणार असल्याची माहिती मिळाली आहे.

भारतीय रेल्वेचा एक भाग असलेल्या रेल विकास निगम (RVNL) या कंपनीतील ८.७२ टक्के हिस्सेदारी LIC ने खरेदी केली आहे. केंद्र सरकारने आपल्या निर्गुंतवणूक योजनेतून याच कंपनीतील १५ टक्के हिस्सा विकणार असल्याची घोषणा यापूर्वी केली होती.

मुंबई शेअर बाजाराला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. RVNL ने यासंदर्भातील माहिती देताना सांगितले की, LIC ने खुल्या बाजारातील करारानुसार या कंपनीचे १८.१८ कोटी शेअर्स खरेदी केले आहे. (lic purchase stake of indian railway company rvnl)

LIC ने RVNL चा ८.७२ टक्के हिस्सा खरेदी केला असल्याचे रेल विकास कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वीही LIC ने संकटात असलेल्या कंपन्यांचे शेअर्स, हिस्सेदारी खरेदी करून त्यांना तारले असल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारतीय आयुर्विमा निगम म्हणजेच LIC अनेक कंपन्यांसाठी तारणहार ठरले आहे. कोणत्याही सरकारी कंपनीला आवश्यकता असते, तेव्हा कंपनीचे शेअर्स किंवा हिस्सा खरेदी करण्यासाठी LIC कायम पुढाकार घेते, असे सांगितले जात आहे.

रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL कंपनीने जाहीर केले होते की, ऑफर फॉर सेल या माध्यमातून १५ टक्के हिस्सा विकणार आहे. यासाठी फ्लोअर प्राइज २७.५० रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे.

मंगळवारी बंद झालेल्या शेअर बाजारानुसार, RVNL ची फ्लोअर प्राइज ९.५४ टक्क्यांनी कमी आहे, असे सांगितले जात आहे. गुरुवारी शेअर मार्कट वधारला होता. तेव्हा RVNL च्या शेअरची किंमत २७.७५ रुपये झाली होती.

शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर RVNL कंपनीच्या शेअर्समध्ये ३ टक्के वाढ होऊन त्याची किंमत २८.६० रुपये झाली आहे. डिसेंबरच्या तिमाहीत RVNL मध्ये सरकारी हिस्सेदारी ८७.८४ टक्के होती.

सन २००३ मध्ये रेल्वे मंत्रालयाकडून RVNL कंपनीची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हा १०० टक्के स्वामित्व भारतीय रेल्वेचे होते. रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि अर्थसंकल्पासाठी संसाधने गोळा करणे तसेच या प्रकारच्या प्रकल्पांची अंमलबजावणी करणे, अशी काही कामे या कंपनीकडून केली जातात.