'घडी'नं बदललं कानपुरच्या भावांचं नशीब; सायकलवरुन साबण विकला, आज आहेत कोट्यवधींचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 09:40 AM2023-08-21T09:40:19+5:302023-08-21T09:57:17+5:30

कानपूरच्या दोन भावांनी एका लहान खोलीतून सुरू केलेला प्रवास आज १२००० कोटी रुपयांपर्यंतच्या कंपनीपर्यंत पोहोचलाय.

अनेकदा आपण वापरत असलेल्या वस्तूंबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नसते, त्याची सुरुवात कशी झाली किंवा त्याचा लोकप्रिय ब्रँड होण्यापर्यंतचा प्रवास आपल्याला माहित नसतो. 'पहले इस्तमाल करें फिर विश्वास करें' ही टॅगलाईन तर तुम्ही नक्कीच ऐकली असेल.

ही टॅगलाईन लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या सर्वांच्याच तोंडावर होती. परंतु या टॅगलाईनच्या मागणी कहाणी मात्र सर्वांना माहित नाही. कानपूरच्या या दोन भावांनी एका लहान खोलीतून सुरू केलेला प्रवास आज १२००० कोटी रुपयांपर्यंतच्या कंपनीपर्यंत पोहोचलाय. दीर्घकाळ केलेल्या संघर्षानंतर त्यांना हे यश मिळालंय. ही कहाणी आहे स्वदेशी वॉशिंग पावडर 'घडी'ची.

कानपूरच्या शास्त्रीनगरमध्ये राहणाऱ्या मुरलीधर ग्यानचंदानी आणि बिमल ग्यानचंदानी या दोन भावांनी घराजवळ एक छोटेसं दुकान सुरू केलं. त्यांचे वडील दयालदास ग्यानचंदानी ग्लिसरीनपासून साबण बनवून विकायचे. साबण बनवण्याचे काम त्यांनी वडिलांकडून शिकले होते, त्यामुळे त्यांनी या दिशेने व्यवसाय करण्याची योजना आखली.

फाजलगंज फायर स्टेशनजवळ एक छोटेसे दुकान घेऊन साबण बनवायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या फॅक्टरीचं नाव श्री महादेव सोप इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड असं होते. साबण बनवण्यास सुरुवात झाली, परंतु त्याची विक्री करणं आव्हानात्मक होतं. निरमा आणि व्हील सारखे ब्रॅण्ड्स आधीच बाजारात होते, त्यांच्यासमोर टिकून राहण सोपं नव्हतं.

ग्यानचंदानी भावांना त्यांच्या साबणांची विक्री करणं कठीण जात होतं. भांडवल जास्त नव्हतं त्यामुळे साबण स्वतःच पोहोचवायचे. सायकलवरून आणि पायी जावून ते दुकानदारांपासून लोकांना रस्त्यावर साबण खरेदी करण्यास प्रवृत्त करत असत. खूप प्रयत्न करूनही त्यांना नफा मिळत नव्हता. असे असूनही दोघांनीही आत्मविश्वास डगमगू दिला नाही.

इतर कंपन्या जे करत नाही, असं काही आपल्याला करावं लागणार असल्याचं त्यांना समजलं. त्यावेळी बहुतांश वॉशिंग पावडर्स निळ्या किंवा पिवळ्या रंगाच्या होत्या. त्यांनी यानंतर पांढऱ्या रंगाची वॉशिंग पावडर बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला. तसंच त्यांनी त्याला एक चांगली टॅगलाईन दिली.

त्यांनी , 'पहले इस्तेमाल करें, फिर विश्वास करें' अशी टॅगलाईन दिली. त्यांची टॅगलाईन प्रत्येकाच्या तोंडावर आली. त्यांनी इतर डिटर्जंट कंपन्यांच्या तुलनेत दुकानदारांना अधिक कमीशन ऑफर केलं. तसंच अन्य कंपन्यांच्या तुलनेत त्यांनी त्यांची किंमतही कमी ठेवली. कालांतरानं त्यांच्या प्रोडक्ट प्रसिद्ध होऊ लागला आणि कानपूरसह आसपासच्या परिसरातही त्याची व्याप्ती पसरली.

कंपनीनं प्रत्येक २००-३०० किलोमीटरवर एक छोटा युनिट डेपो उभारण्यास सुरुवात केली. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचा खर्चही कमी झाला आणि प्रोडक्ट लवकर पोहोचायला लागला. २००५ मध्ये त्यांनी आपल्या कंपनीचं नाव बदलून Rohit Surfactants Private Limited (RSPL) केलं. हळूहळू त्यांचा प्रोडक्ट देशभरातील अन्य राज्यांमध्ये पोहोचला.

ज्या कंपनीची सुरुवात छोट्या खोलीतून झाली ती आज देशभरात पसरलेली आहे. कंपनी आज केवळ वॉशिंग पावडर किंवा साबण नाही, तर हँडवॉश, रुम फ्रेशनर, टॉयलेट क्लिनर, व्हिनस, नमस्ते इंडिया सॅनिटरी नॅपकिन, रेड चीफ फुटवेअर आणि रियल इस्टेट पर्यंत पसरलेली आहे. कंपनीचं व्हॅल्युएशन आज १२००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचलंय.

एका छोट्या कंपनीपासून सुरूवात करणारे मुरलीधर ग्यानचंदानी आणि विमल ग्यानचंदानी आज उत्तर प्रदेशातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. दोघांचंही एकत्रित नेटवर्थ २० हजार कोटींपेक्षा अधिक आहे. २०२२ मध्ये हुरुन रिच लिस्टनुसार बिमल ग्यानचंदानी यांची नेटवर्थ ८००० कोटी रुपये आहे, तर मोठा भाऊ मुरलीधर ग्यानचंदानी यांच्याकडे १२ हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. मुरलीधर ग्यानचंदानी हे भारतातील श्रीमंतांच्या यादीत १४९ व्या क्रमांकावर आहेत.