जगाला भारताची ताकद दाखवणार, गौतम अदानींची घोषणा; मार्गही निवडला, असा आहे प्लान...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 04:30 PM2022-07-26T16:30:54+5:302022-07-26T16:40:43+5:30

Gautam Adani Announce: जगातील चौथे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी नुकतंच भारत तेलावर खूप अवलंबून असल्याचं विधान केलं होतं. गौतम अदानींना हेच बदलायचं आहे. त्यांनी आपलं व्हिजन आता सर्वांसमोर मांडलं आहे.

भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी मंगळवारी आपल्या कंपनीच्या शेअरहोल्डर्सना संबोधित केलं. आपल्या कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्यावाचून कधीच मागे हटत नाहीत आणि गुंतवणुकीचा वेगही कधीच कमी होऊ दिला नाही, असं अदानी म्हणाले.

हरित ऊर्जा (Green Energy) क्षेत्रात प्रस्तावित ७० बिलियन डॉलरच्या गुंतवणुकीचं उदाहरण देत गौतम अदानी यांनी आपल्या व्हिजनला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. ग्रीन हायड्रोजन हेच भविष्याचं इंधन असल्याचं अदानी म्हणाले.

बाजारातील विविध परिस्थितींमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी अदानी समूहानं आपल्या कंपन्यांना सक्षम बनवलं आहे असं गौतम अदानी म्हणाले. "अदानी समूहाचं यश भारताच्या यशावर अवलंबून आहे. जगात असा कोणताच दुसरा देश नाही जो भारताप्रमाणे चांगल्या परिस्थितीत आहे. देशाचं भविष्य आपल्या हातात आहे हा विश्वास साथर्की लावण्यासाठी सर्वात मोठा पुरावा भारताच्या ग्रीन एनर्जीमध्ये आपण ७० बिलियन डॉलरची गुंतवणूक करत आहोत", असं गौतम अदानी म्हणाले.

"आपण याआधीपासूनच सौरऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठे उत्पादक आहोत. अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात आपली क्षमता ग्रीन हायड्रोजनला भविष्यातील इंधन बनवण्यात मदत मिळेल", असंही अदानी म्हणाले. नुकतंच जगातील चौथे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनलेले गौतम अदानी यांनी भारत तेलावर सर्वाधिक अवलंबून आहे आणि हेच बदलून भारताला ग्रीन एनर्जीचा नेट एक्स्पोटर बनवण्याचं ध्येय असल्याचं अदानी यांनी म्हटलं.

"अदानी समूह देशातील सर्वात मोठा एअरपोर्ट ऑपरेटर बनला आहे. आपल्याला देशातील अनेक मोठ्या रस्त्यांचंही कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे आणि अशा पद्धतीनं देशाच्या पायाभूत संरचना विकसीत करण्यात महत्वाचं योगदान देत आहोत. अदानी विल्मरला यशस्वी आयपीओ बनवून देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी बनली आहे", असंही अदानी म्हणाले.

अदानींनी सिमेंट सेक्टरमध्ये नुकतीच एन्ट्री घेतली आहे. "एसीसी आणि अंबुजासह होलसिमच्या इतर संपत्तीच्या अधिग्रहणातून आपण भारतातील दुसरे सर्वात मोठे दुसरे सिमेंट उत्पादक बनले आहोत. आपण डेटा सेंटर, डिजिटल सुपरअॅप, डिफेन्स व एअरोस्पेस सेक्टरसाठी इंडस्ट्रियल क्लाउड, मेटल्स अँड मटेरियल्ससारख्या क्षेत्रातही उतरले आहोत. हे सर्व आत्मनिर्भर भारत मोहिमेत महत्वाचं योगदान देणारी क्षेत्र आहेत", असं गौतम अदानी म्हणाले.

गौतम अदानींनी कंपन्यांच्या शेअर मार्केटमध्ये उत्तम कामगिरी केल्याचाही उल्लेख केला. "आपलं कम्बाइंड ग्रूप मार्केट कॅपिटलायझेशन यंदाच्या वर्षात २०० बिलियन डॉलरच्या पलिकडे पोहोचलं आहे. आपण आंतरराष्ट्रीय बाजारातून अब्जावधी डॉलर भारतात गुंतवण्यात यशस्वी झाले आहोत", असं अदानी म्हणाले.

भारताला जगातील औद्योगिक विकासात सर्वात बलाढ्य देश बनवण्याचा इरादा असल्याचं अदानींनी म्हटलं.

भारतातील युवा पिढीवर गौतम अदानींनी विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, "भारत देशाला त्याचा जुना आर्थिक दर्जा मिळवून देण्याची आणि जागतिक समस्यांमधली प्राथमिक शक्ती म्हणून स्थान देण्याची तळमळ देशातील युवा पिढीमध्ये दिसते"