इलेक्ट्रिसिटीसंदर्भातील नियम बदलले, आता 7 दिवसांत मिळणार नवे कनेक्शन; ग्राहकांना होणार मोठे फायदे

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 22, 2020 09:00 PM2020-12-22T21:00:44+5:302020-12-22T21:08:29+5:30

इलेक्ट्रिसिटी अथवा वीज व्यवस्था सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. सरकारने वीज ग्राहकांना सशक्त करण्यासाठी अनेक नियमांत बदल केले आहेत.

नव्या नियमांप्रमाणे वीज कनेक्शन देणे, वीज बिल जमा करण्याची सुविधा आणि वीज पुरवठ्यासंदर्भात ग्राहकांचे विजेसंदर्भातील अधिकार निश्चित करण्यात आले आहेत.

घराघरात वीज पोहोचवण्याचे लक्ष्य - देशातील घराघरात वीज पोहोचावी, असे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. याच अनुषंगाने आता पावर सेक्टरमध्ये ग्राहकांसाठी काही मानक तय करण्यात आले आहेत. वीजमंत्रालयाचे हे नियम ग्राहकांच्या अधिकारांशी संबंधित आहेत.

नव्या वीज नियमांत अनेक बदल - सरकारच्या नव्या नियमांनुसार, वीज पुरवठ्यासंदर्भात ग्राहकांजवळ वीज वितरण कंपन्यांकडून किमान मानक सेवा मिळविण्याचा अधिकार आहे. नव्या नियमांसंदर्भात माहिती देताना वीजमंत्री आरके सिंह म्हणाले, आता कोणताही ग्राहक विजेशिवाय नसेल. प्रत्येक घरात वीज पोहोचवणे सरकारचे लक्ष्य आहे.

कंपन्यांवर असेल लक्ष - आता वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना निश्चित मानकांप्रमाणेच सेवा पुरवावी लागेल. त्यांनी याचे पालन केले नाही, तर त्यांना दंडही भरावा लागेल. नव्या नियमांनुसार, वीज कायद्याप्रमाणे वीज पुरवठा करणे, हे प्रत्येक वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीचे कर्तव्य आहे.

नव्या कनेक्शनसाठी मानक प्रक्रिया लागू - ग्राहकांची समस्या लक्षात घेत, नव्या वीज कनेक्शनसंदर्भात नियमांत बदल करण्यात आले आहेत. नव्या कनेक्शनसाठी मानक प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. नव्या वीज कनेक्शनसाठी ग्राहकांना घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. शहरांपासून ते गावांपर्यंत नव्या वीज कनेक्शनसंदर्भात नवे नियम तयार करण्यात आले आहेत.

7 दिवसांच्या आत द्यावे लागेल कनेक्शन - आता महानगरांमध्ये नव्या वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यानंतर वीज वितरण कंपन्यांना 7 दिवसांच्या आत नवे कनेक्शन द्यावे लागेल. नगर पालिका हद्दीत नवे कनेक्शन अथवा त्यात सुधार करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. तर ग्रामीण भागात 30 दिवसांच्या आत नवे कनेक्शन द्यावे लागेल.

मीटरशिवाय कनेक्शन नाही - आता मीटरशिवाय कुठलीच जोडणी केली जाणार नसल्याचे निश्चित करण्यात आले आहे. हे मीटर स्मार्ट अथवा प्री-पेमेंट मीटर असेल. या नियमामुळे ग्राहकांना रिचार्जची सुविधा मिळणार आहे.

मीटरचे परीक्षण, त्यातील त्रुटी, जळाल्यास किंवा चोरीच्या स्थिती करताही तरतुदी करण्यात आल्या आहेत.

ग्राहकांसाठीचे दर आणि देयकातही पारदर्शकता असणार आहे. याचबरोबर ग्राहकांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन बील भरण्याचा पर्यायही मिळणार आहे. याशिवाय, आधीच वीज बिल भरण्याचाही पर्याय असणार आहे. वीज वितरण कंपन्या सर्व ग्राहकांना 24 तास वीज देईल.

ग्राहकांना मिळाले अनेक अधिकार - वीज वितरण कंपन्यांना एक ऑटोमॅटिक सिस्टम विकसित करावी लागणार आहे. ज्याच्या सहाय्याने वीज खंडीत झाल्यास लक्ष ठेवता येईल आणि ती तत्काळ सुरळीत करण्यात येईल.

या नव्या नियमानुसार, खंडित झालेला वीज पुरवठा निर्धारित वेळेत पुन्हा सुरळीत झाला नाही, तर अशा स्थितीत संबंधित वीज कंपनीला ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी लागेल. एवढेच नाही, तर सातत्याने वीज खंडित केल्यासही कंपन्यांना दंड आकारला जाईल.