मोदींनी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केल्यावर दुसऱ्या दिवशी काय घडलं? आकडा पाहून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 16:37 IST2020-05-22T15:53:51+5:302020-05-22T16:37:56+5:30

देशाला कोरोना संकटाचा मोठा फटका बसला असून उद्योगधंदे ठप्प असल्यानं देशाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा केली. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे उद्योगधंदे ठप्प आहेत.

एकीकडे कोरोना संकटामुळे आरोग्य व्यवस्थेवरील खर्च वाढला आहे. तर दुसरीकडे महसूलच मिळत नसल्यानं सरकारी तिजोरीवर परिणाम होत आहे.

कोरोना संकट येण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था मंदीसदृश्य परिस्थितीतून जात होती. त्यात आता कोरोनानं भर घातली आहे.

अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ मे रोजी २० लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज देशाच्या जीडीपीच्या १० टक्के असल्याचं मोदी म्हणाले.

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदींनी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. मात्र यानंतर परदेशातील अनेकांनी त्यांची गुंतवणूक काढून घेतली.

मोदींनी २० लाख कोटी रुपयांचं आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एफपीआय (फॉरेन पोर्टफोलियो इन्व्हेस्टमेंट) गुंतवणूकदारांनी ६ हजार ६६ कोटी रुपये काढून घेतले. नॅशनल सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज लिमिटेडनं (एनएसडीएल) याबद्दलची आकडेवारी जाहीर केली.

गेल्या सहा दिवसांत एफपीआय गुंतवणूकदारांनी भारतातून २१ हजार ३०८ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे.

मार्चपासून देशात कोरोनाचे रुग्ण सापडू लागले. तेव्हापासून देशातील परकीय गुंतवणूक बाहेर जाऊ लागली आहे.

एकट्या मार्च महिन्यात १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतली. याआधी गुंतवणूकदारांनी कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली गेली नव्हती.

गेल्या काही दिवसांत विविध संस्थांनी भारताच्या विकासदराबद्दलचे अंदाज वर्तवले आहेत. येत्या काळात परिस्थिती प्रतिकूल राहणार असल्याचं या अंदाजांमधून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे.

















