वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 10:53 IST2025-05-02T10:48:24+5:302025-05-02T10:53:54+5:30

२०२५ पर्यंत भारतात सोन्याची मागणी ७०० ते ८०० टनांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज डब्ल्यूजीसीने व्यक्त केला आहे.

भारतात सोन्याची मागणी या वर्षी जानेवारी-मार्च तिमाहीत १५ टक्क्यांनी घसरून ११८.१ टनांवर आली तर या सोनेखरेदीचे मूल्य २२ टक्क्यांनी वाढून ९४,०३० कोटी रुपये इतके झाले आहे, अशी माहिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (डब्ल्यूजीसी) दिली.

२०२५ पर्यंत भारतात सोन्याची मागणी ७०० ते ८०० टनांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज डब्ल्यूजीसीने व्यक्त केला आहे.

२०२५च्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमती २५ टक्क्यांपर्यंत वाढल्या असून, प्रतितोळा १ लाखापर्यंत पोहोचल्या आहेत. यामुळे ग्राहकांच्या सोनेखरेदीच्या पद्धतीत बदल झाला आहे, असे अहवालात म्हटले आहे.

‘डब्ल्यूजीसी’ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जैन यांनी अहवालात म्हटले की, वाढलेल्या किमतीमुळे लोकांच्या खरेदीवर ताण पडणार असला तरी अक्षयतृतीया, आगामी लग्नसराई खरेदीसाठी उत्साह कायम आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव सातत्याने वाढत असले तरी लोकांचा खात्रीशिर परतावा देणारा पर्याय म्हणून सोन्यावर विश्वास आजही कायम आहे.

७१.४ टन -इतक्या दागिन्यांची खरेदी पहिल्या तीन महिन्यांत झाली. यात २५ टक्क्यांनी घट नोंदवली आहे.

४६.७ टन -इतकी सोन्याची मागणी जानेवारी-मार्च या काळात होती. यात ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सोन्याची आयात जानेवारी-मार्च तिमाहीत ८ टक्क्यांनी वाढून १६७.४ टन इतकी. सोन्याचा पुनर्वापर ३२ टक्क्यांनी घटून २६ टनांवर आला. सोन्याची किंमत ७९,६३३ रुपये प्रति १० ग्रॅम होती. २०२४च्या पहिल्या तिमाहीत ही किंमत प्रतितोळा ५५,२४७ रुपये इतकी होती.