अनिल अंबानींना दिलासा! ४ हजार कोटींच्या तोट्यानंतर ‘या’ कंपनीला भरघोस नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:16 PM2021-05-09T16:16:17+5:302021-05-09T16:21:38+5:30

अनिल अंबानी (anil ambani) यांच्या रिलायन्स पॉवर (Reliance Power) या कंपनीने कोरोनाच्या काळात ७२ कोटींचा नफा कमावला आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून उद्योजक अनिल अंबानी (anil ambani) यांचा पाय अधिकाधिक खोलात जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच आर्थिक संकटात सापडल्यामुळे अनिल अंबानी त्यांच्यापुढे दररोज नवनवीन समस्या उभ्या राहत आहेत.

मात्र, आता अनिल अंबानी यांच्यासाठी दिलासादायक माहिती आहे. रिलायन्स पॉवर (Reliance Power) या कंपनीने ७२ कोटींचा नफा कमावला आहे. रिलायन्स पॉवर ही कंपनी पूर्वी रिलायन्स एनर्जी या नावाने ओळखली जात होती. याच कंपनीला कोरोना काळात चांगला नफा मिळाला आहे.

रिलायन्स पॉवरने मार्च २०२१ च्या तिमाहीत ७२.५६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. तर मार्च २०२० मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला ४,२०६ कोटींचा निव्वळ तोटा झाला होता.

म्हणजेच कंपनीला ४ हजार २०६ कोटींचा तोटा सहन करावा लागल्यानंतरही ७२.५६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे अनिल अंबानी आणि रिलायन्स इन्फ्राचे सीईओ राजा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रिलायन्स पॉवरला या काळात नफ्यासोबतच उत्पन्नातही वाढ झाली आहे. या वर्षाच्या मार्च तिमाहीत कंपनीचे उत्पन्न हे १,६९१ कोटी रुपये होते. तर एका वर्षापूर्वी याच काळात १,९०२ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले.

गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला एकत्रित निव्वळ नफा २२८.६३ कोटी रुपये इतका होता. तर त्या आधीच्या वर्षी हा नफा ४,०७६ कोटी इतका होता.

दरम्यान, अनिल अंबानी यांची एकेकाळी दूरसंचार सेवेतील आघाडीची कंपनी असलेली रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीत गेली, तर किमान ४० हजार कोटींच्या कर्जावर पाणी सोडावे लागेल या भीतीने सध्या बँकांचा जीव टांगणीला लागला आहे.

या ३८ बँकांनी रिलायन्स कम्युनिकेशनला ४० हजार कोटीचे कर्ज दिले आहे. तर चायना डेव्हलपमेंट बँकेच्या नेतृत्वात चीन बँकांनी ९ हजार कोटींचे कर्ज दिले आहे. तसेच एसबीआयने ३ हजार कोटींचे कर्ज दिले असून, एलआयसीचे ३ हजार ७०० कोटी रिलायन्स कम्युनिकेशनने थकवले आहेत.

दरम्यान, कर्ज फेडणे शक्य होत नसल्याने अनिल अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी येस बँकेला (Yes bank) आपले हेड ऑफिस विकले आहे. अनिल अंबानी यांनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे मुंबई येथील मुख्य कार्यालय येस बँकेला १,२०० कोटी रुपयांना विकल्याची माहिती मिळाली आहे.