Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत गौतम अदानींचंही सहकार्य; ऑक्सिजनची कमतरता होणार दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 10:51 AM2021-05-09T10:51:04+5:302021-05-09T11:02:07+5:30

अदानी समूहानं ७८० टन ऑक्सिजन नेण्यास सक्षम असलेल्या ४८ क्रायोजेनिक टँक खरेदी केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून देशात सातत्यानं मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दररोज देशात साडेतीन ते चार लाखांच्या जवळपास रुग्णांची नोंद होत आहे.

सध्या देशात ऑक्सिजनची आणि काही औषधांची कमतरताही असल्याचं दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर अदानी समुहानंही पुढाकार घेत मदत सुरू केली आहे. अदानी समुहानं यासंदर्भातील माहितीही दिली आहे.

अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनाविरोधातील लढाईत अदानी समुहानंही आपल्या सर्व स्त्रोतांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये कर्मचारी आणि लॉजिस्टिक्सपासून बंदरे आणि विमानतळांचाही समावेश आहे.

वैद्यकीय वापरासाठी लागणारा ऑक्सिजन आणि त्यांच्या वहनासाठी योद्य क्रायोजेनिक कंटेनर्सच्यासोबतच आरोग्य सेवेसाठी पायाभूत सुविधांसाठीही मदत केल्याची माहिती अदानी समुहानं दिली आहे.

७८० टन द्रव स्वरूपातील ऑक्सिजन नेण्यास सक्षण असलेल्या ४८ क्रायोजेनिक टॅक्सचीही खरेदी केल्याची माहिती अदानी समुहाच्या प्रवक्त्यांनी दिली.

"भारतात जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली त्याच वेळी अदानी समुहानं आपल्या परदेशातील सपर्कांची मदत घेण्यास सुरूवात केली," अशी माहिती अदानी समुहाच्या प्रवक्त्यांनी दिली.

या मदतीच्या सहाय्यानं वैद्यकीय वापरासाठी लागणारा ऑक्सिजन आणि परिवहनासाठी क्रायोजेनिक कंटेनरसारख्या महत्त्वपूर्ण वस्तूंचा पुरवठा सुरू राहावा, असं अदानी समुहाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

समुहानं सौदी अरेबिया, थायलँड, सिंगापुर, तैवान आणि संयुक्त अरब अमिरातीतील बड्या उत्पादकांकडून ४८ क्रायोजेनिक टँक खरेदी केल्याचंही त्यांनी नमूद केलं.

यापैकी काही मोठे क्रायोजेनिक टँक गुजरात स्थित मुंद्रा बंदराच्या माध्यमातून पाठवण्यात आले.

तर अन्य भारतीय हवाई दलाच्या मदतीनं देशात आणण्यात आल्याचंही कंपनीनं सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून देशात सातत्यानं मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ४,३,७३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली.

तर दुसरीकडे ३,८६,४४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर गेल्या चोवीस तासांत ४,०९२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.

दरम्यान, देशात सध्या ३७,३६,६४८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीतडे १६,४,३,६६३ लोकांचं आतापर्यंत अताापर्यंत लसीकरण करण्यात आलं आहे.