Sawan 2021: श्रावणात जिवतीचा कागद का पूजला जातो? जाणून घ्या महत्त्व आणि नेमका भावार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 10:08 AM2021-08-11T10:08:16+5:302021-08-11T10:13:40+5:30

Sawan 2021: श्रावणातील पहिल्याच दिवशी देवघरात लावल्या जाणाऱ्या जिवतीच्या कागदाचा (Jivati Paper) आणि यातील देवतांचे विशिष्ट क्रम, त्याचा नेमका अर्थ यांविषयी जाणून घेऊया...

श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. संपूर्ण श्रावणभर विविध व्रते, सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने, भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. आषाढ महिन्याच्या अमावास्येला दीपपूजनाने श्रावणाची सुरुवात केली जाते. याच दिवशी जिवतीचा कागद देवघरात चिकटवला जातो आणि त्याचे पूजन केले जाते. (jivaticha kagad)

श्रावणी सोमवारी शिवपूजन, श्रावणी मंगळवारी मंगळागौर, श्रावणी बुधवार आणि गुरुवारी बुध-बृहस्पती पूजन, श्रावणी शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन, श्रावणी शनिवारी अश्वत्थ मारुती आणि नृसिंह पूजन, श्रावणी रविवारी आदित्य राणूबाई पूजन केले जाते. (real meaning of jivati paper)

गतवर्षीप्रमाणे यंदाही श्रावणात कोरोनाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. श्रावणातील पहिल्याच दिवशी देवघरात लावल्या जाणाऱ्या जिवतीच्या कागदाचा आणि जिवतीची पूजा, या कागदातील देवतांचे विशिष्ट क्रम, त्याचा नेमका अर्थ यांविषयी जाणून घेऊया... (jivati paper worshipped in shravan month)

संपूर्ण श्रावण महिना जिवतीचा कागद मातृशक्तीकडून पूजला जातो. आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना यावेळी केली जाते. जिवतीचा हा कागद विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच तसबिरीत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केल्या जाते. (significance of jivati paper)

यामधील एकही देवता किंवा त्यांचे स्थान आजतागायत बदललेली दिसत नाही. जिवती प्रतिमेत नृसिंह, कालियामर्दन करणारा बाळकृष्ण, मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध - बृहस्पती या देवतांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजल्या जाते.

जिवतीच्या कागदात प्रथम विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्त प्रल्हादासाठी प्रगट झाले. ही कथा आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यांपासून संरक्षण करणे, याच मुख्य आणि मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला.

बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह वा नृसिंह देवतेचे पूजन केले जाते. उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी यांसारख्या संकटांपासून नरसिंह देवता घरातील बाळाचा बचाव करतात, अशी मान्यता आहे.

जिवतीच्या कागदावर यानंतर कालियामर्दन करणारा बाळकृष्ण येतो. यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही श्रावणातील आराध्य देवता असल्या, तरी कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येते की, या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला.

खेळणाऱ्या, बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर त्यांना अभय देणारा, खेळत-बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन स्वरुपात पूजला जातो. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून या दोन्ही देवता बालकांचे संरक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांना वरचे स्थान आहे, अशी मान्यता आहे.

जिवतीच्या कागदात यानंतर येतात, त्या जरा-जिवंतिका. जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ या नावाने ओळखले जाऊ लागले.

पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. जिवंतिका पूजनामुळे घरात, आरोग्य, धन, सुख लाभते, असे म्हटले जाते.

जिवतीच्या कागदात सर्वांत शेवटी येतात, ते बुध - बुधस्पती. बुध हत्तीवर बसलेला असून, त्याच्या हाती अंकुश आहे. तर बृहस्पती वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने व्यक्तीला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्त्व, वाक्पटुत्व असे गुण प्राप्त होतात. बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते.

बुधाचे वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्ततेचे प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तात आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश, आवर घालावा, हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते. बृहस्पतीचे वाहन वाघ. हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या प्रगतीमध्ये, आध्यात्मिक साधनेत बाधक ठरतो.

त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा, हे बृहस्पती आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध - बृहस्पती यांना जिवती कागदात स्थान मिळाले आहे. प्रथम संरक्षक देवता, यानंतर बालकांचे संरक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि शेवटी व्यक्तिमत्त्व प्रभावित करणाऱ्या देवता, असा हा जिवती कागदाचा क्रम. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन.