Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:18 IST2025-05-21T16:13:13+5:302025-05-21T16:18:46+5:30

Luck Sign: रोज सकाळी आपण देवपूजा करतो, ती केवळ देवाची सेवा म्हणून नाही तर आपले मन प्रसन्न व्हावे ही त्यामागील भावना असते. देवदर्शन घेतो, शांत चित्ताने उभे राहतो ते काही मागण्यासाठी नाही तर देव आपल्या पाठीशी आहे हा दिलासा आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी! आपला भाव शुद्ध असेल तर ईश्वरी कृपा होते आणि तसे शुभसंकेतही आपल्याला मिळतात. ते कसे ओळखायचे ते पाहू!

देवपूजा हे असे निमित्त आहे, जिथे रोजच्या व्यग्र दिनचर्येतले काही क्षण आपण ईश्वरी सान्निध्यात घालवतो. जर न चुकता देवाची पूजा केली, तर ईश्वरी संकेत आपल्याला मिळतात आणि ते ओळखताही येतात. त्याबद्दल जाणून घेऊ.

शहरी भागात गोमातेचे दर्शन रोज होतेच असे नाही, मात्र देवपूजा करताना योगायोगाने गायीचे दर्शन झाले वा तिचे हंबरणे ऐकू आले तर ते शुभ संकेत आहेत असे समजा. गायीच्या पोटात तेहेतीस कोटी देव वास करतात अशी आपल्याकडे मान्यता आहे. त्यामुळे तिचे दर्शन अथवा आवाज कानावर पडणे हे शुभ लक्षण आहे.

देवाला वाहिलेले फुल प्रार्थनेच्या वेळी कोणत्याही धक्क्याशिवाय खाली पडले तर तुमची प्रार्थना भगवंतापर्यंत पोहोचली असे समजा. यालाच आपण देवाचा कौल असेही म्हणतो. देवपूजेच्या वेळी देवाला वाहिलेले फूल खाली पडणे यालाही ईश्वर कृपा मानली जाते.

पूजेच्या वेळी दारावर कुणी याचक येत असेल तर तो ईश्वरी अंश आहे असे समजून त्याला यथाशक्ती मदत करा. बाकीची घरं सोडून तो याचक तुमच्याकडे येत असेल तर तुमच्याकडे देण्याची योग्यता आहे, जी देवानेच तयार केली आहे आणि तुमच्याकडून दान धर्म व्हावा असेही त्यामागील संकेत आहेत असे समजावे.

पूजा करतेवेळी एका क्षणी आपण इतके समरसून जातो, की मनात कोणतेही विचार, सुख, दुःख नसतानाही कारुण्य दाटून येते आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हे संवेदनशील मनाचे लक्षण आहे, देवाला असेच संवेदनशील मनाचे लोक आवडतात, त्यांच्यावर सदैव कृपा राहते.

संवाद तेव्हाच होतो, जेव्हा दोन व्यक्तींचा परिचय होतो, विचार लहरी जुळतात, हीच बाब देवाच्या बाबतीत असते. देव हसतो, बोलतो हे आपण संतांच्या अनुभवातून ऐकले आहे, पण जेव्हा आपण ही समरसता रोजच्या पूजेत अनुभवतो तेव्हा आपल्यालाही नेहमीचीच देवाची मूर्ती, प्रतिमा आपल्याकडे पाहून हसत असल्याचा भास होतो, ही देखील ईश्वरी कृपाच आहे.

मंदिरात गेल्यावर प्रसाद मिळतोच, पण घरी देवपूजा करताना अचानक शेजार-पाजारची व्यक्ती येते आणि तिरुपतीचा, पंढरपूरचा, सिद्धिविनायकाचा, ग्राम दैवताचा, सत्यनारायणाचा प्रसाद देऊन जाते, त्यावेळीही ईश्वरी कृपा आपल्यावर असल्याची प्रचिती येते.