Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:55 IST2025-06-27T15:32:27+5:302025-06-27T15:55:40+5:30
Jagannath Rath Yatra 2025: दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितीयेला ओडिशातील पुरी येथे होणारी भगवान जगन्नाथाची रथयात्रा ही केवळ श्रद्धेचा एक महान उत्सव नाही तर त्यात साजरी होणाऱ्या परंपराही तितक्याच अद्भुत आणि दिव्य आहेत.

आजपासून सुरू झालेल्या रथयात्रेत पुन्हा एकदा ते दृश्य दिसेल, जेव्हा पुरीचे गजपती महाराज स्वतः सोन्याच्या झाडूने रथासमोरील स्वच्छता करतील. पण तुम्हाला माहितीय का, जगन्नाथाचा मार्ग सोन्याच्या झाडूने का स्वच्छ केला जातो? या परंपरेचे नाव आहे- छेरा पहारा आणि त्यामागे एक खोल आध्यात्मिक रहस्य लपलेले आहे.
'छेरा पहारा' विधीचे महत्त्व काय आहे?
जगन्नाथ रथयात्रेदरम्यान, जेव्हा भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा रथांवरून नगरभ्रमणाला, निघतात तेव्हा त्यांच्या रथाचा मार्ग प्रथम सोन्याच्या झाडूने स्वच्छ केला जातो. हा विधी पुरीच्या गजपती राजघराण्याकडून केला जातो. पौराणिक श्रद्धेनुसार, सोने हे केवळ धातू नसून पवित्र उर्जेचा स्रोत आहे. सोन्याच्या झाडूने परमेश्वराचा मार्ग स्वच्छ करणे हे दर्शविते की राजा स्वतःला परमेश्वराच्या चरणांचा सेवक मानतो. ही परंपरा असा संदेश देखील देते की देवासमोर सर्वजण समान आहेत, मग तो राजा असो किंवा रंक.
वैदिक मंत्र आणि सोन्याच्या झाडूने स्वच्छता :
छेरा पहारा दरम्यान, केवळ सोन्याच्या झाडूने स्वच्छता होत नाही, तर वैदिक मंत्रांचे पठण देखील केले जाते. यामुळे हा मार्ग केवळ बाह्यरित्या स्वच्छ होत नाही तर आध्यात्मिक दृष्ट्याही पवित्र होतो.
रथयात्रा का काढली जाते?
असे मानले जाते की एकदा देवी सुभद्रा यांनी पुरी शहराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर भगवान जगन्नाथ आणि बलभद्र तिला शहर दाखवण्यासाठी रथावर बसून निघाले. देवरूपी भावंडं रथात स्वार होऊन फिरण्यासाठी निघालेत, हे विलोभनीय दृष्य पाहता त्यांना दरवर्षी रथप्रवास घडवायचा असे भाविकांनी ठरवले. प्रवासादरम्यान, तिन्ही देव गुंडिचा मंदिर ताज येथे जातात, जे देवी सुभद्राचे मातृगृह मानले जाते. ते तेथे सात दिवस राहतात आणि नंतर परत येतात.
लाखो भाविकांना पुण्य मिळते :
रथयात्रेत सहभागी होऊन रथ ओढण्याची संधी मिळणे हे देवाचे आशीर्वाद मानले जातात. असे मानले जाते की यामुळे जीवनातील सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो. म्हणून जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी भाविकांची चढाओढ सुरु असते. तो रथ एवढा जड, अजस्त्र असतो की तो ओढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्य बळ लागते.
यावरूनच रूढ झाला वाकप्रचार :
वर म्हटल्याप्रमाणे जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी मोठे मनुष्यबळ लागते, त्याचप्रमाणे कोणतेही अवघड कार्य पार पाडायचे असेल त्या कार्याला जगन्नाथाचा रथ संबोधले जाते आणि तो ओढण्यासाठी अर्थात कार्यपुर्तीसाठी लोकांनी संघटित व्हायला हवे, असे सुचवले जाते.