बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:35 IST2025-12-17T12:12:23+5:302025-12-17T12:35:03+5:30

Baba Vanga's Prediction for 2026: बाबा वेंगा (Baba Vanga) म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ती त्यांनी केलेली विनाशकारी भाकिते—महायुद्धे, नैसर्गिक आपत्ती आणि रोगराई. पण 'बाल्कनची नॉस्ट्राडेमस' म्हटल्या जाणाऱ्या बाबा वेंगा यांनी मानवाच्या भविष्याबद्दल केवळ भीतीदायकच नाही, तर काही अत्यंत सकारात्मक आणि आशादायी भाकिते देखील केली आहेत.

आजवर आपण त्यांची भीतीदायक भविष्यवाणी पाहिली, आज सकारात्मक गोष्टीही जाणून घेऊया. चला जाणून घेऊया बाबा वेंगा यांनी मानवाच्या उज्ज्वल भविष्याबद्दल तसेच भारत आणि आशिया खंडाबाबत नेमकी कोणती चांगली भाकिते केली आहेत:

बाबा वेंगा यांनी एका भाकितात म्हटले होते की, २१ व्या शतकाच्या सुरुवातीला मानवजातीला कॅन्सर (Cancer) यांसारख्या गंभीर आजारातून मुक्ती मिळेल. "तो दिवस येईल जेव्हा कॅन्सरला लोखंडी साखळ्यांनी बांधले जाईल," असे त्यांनी म्हटले होते. याचा अर्थ असा की विज्ञानाच्या प्रगतीमुळे या रोगावर खात्रीशीर उपचार उपलब्ध होतील.

वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास पाहता, बाबा वेंगा यांनी दिलेला एक संकेत खूप सकारात्मक आहे. त्यांच्या मते, मानव सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा (Solar Energy) इतका प्रगत वापर करेल की इंधनाची समस्या कायमची मिटेल. यामुळे पृथ्वीला पुन्हा हिरवेगार होण्यास मदत होईल.

बाबा वेंगा यांनी भाकीत केले आहे की, मानव केवळ पृथ्वीवरच मर्यादित राहणार नाही. आपण अवकाशात नवीन जगाचा शोध घेऊ. त्यांच्या मते, मानव परग्रहावरील लोकांशी (Aliens) संपर्क साधेल आणि त्यांच्याकडून प्रगत तंत्रज्ञान आणि वैश्विक शांततेबद्दल माहिती मिळवेल. यामुळे मानवी प्रगतीचा वेग कैकपटीने वाढेल.

विज्ञानाच्या प्रगतीबद्दल बोलताना त्यांनी म्हटले होते की, भविष्यात मानवाचे निकामी झालेले अवयव (Organs) कृत्रिमरित्या तयार केले जातील. यामुळे अपघातात किंवा आजारपणात अवयव गमावलेल्या व्यक्तींना पुन्हा नवीन आयुष्य मिळेल आणि मानवाचे सरासरी आयुष्य वाढेल.

जरी त्यांनी सुरुवातीच्या काळात युद्धांची भाकिते केली असली, तरी २३ व्या शतकानंतरचा काळ (२३४१ नंतर) अत्यंत शांततेचा असेल, असे त्यांनी सांगितले आहे. मानवाला आपल्या चुकांची जाणीव होईल आणि संपूर्ण जग एका शाश्वत शांततेच्या (Eternal Peace) युगात प्रवेश करेल, जिथे द्वेष आणि सीमावादाला जागा नसेल.

बाबा वेंगा यांच्या एका प्रसिद्ध भाकितानुसार, २०२६ ते २०३० या काळात जागतिक सत्तेचे केंद्र पश्चिमेकडून (अमेरिका/युरोप) पूर्वेकडे म्हणजेच आशियाकडे सरकेल. आज भारत आणि चीन ज्या वेगाने प्रगती करत आहेत, ते पाहता अनेक विश्लेषकांचे असे मत आहे की, भारत या काळात जगातील एक मोठी आर्थिक आणि राजकीय शक्ती म्हणून उभारेल.

अलीकडच्या काही अर्थांनुसार, बाबा वेंगा यांनी २०२६ मध्ये आशियात काही तणावाचे संकेत दिले असले तरी, त्यानंतरच्या काळात नवीन युती आणि प्रादेशिक विस्तार होईल असे म्हटले आहे. भारतासाठी याचा अर्थ असा काढला जातो की, दीर्घकालीन तणावानंतर भारत आपल्या शेजारील देशांशी संवाद साधून शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी होईल.

एक अतिशय रंजक भाकीत असे आहे की, भविष्यात मानव मंगळ ग्रहावर वस्ती करेल आणि तिथे 'गंगे'सारख्या पवित्र नद्यांचे अस्तित्व किंवा त्या नावाशी संबंधित काहीतरी शोधले जाईल. हे भाकीत भारताच्या अवकाश मोहिमांच्या (ISRO) यशाशी आणि भविष्यातील अंतराळ संशोधनाशी जोडून पाहिले जाते.

बाबा वेंगा यांनी पूर्वी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल अचूक भाकीत केले होते. त्यांनी असेही सुचवले होते की, आशियातील एक देश (ज्याचा संबंध भारताशी जोडला जातो) जगाला आध्यात्मिक आणि नैतिक दिशा देण्याचे काम करेल.

भारतातील आयटी (IT) आणि एआय (AI) क्षेत्रातील प्रगती पाहता, बाबा वेंगा यांचे विज्ञानातील क्रांतीचे भाकीत भारतासाठी खूप सकारात्मक आहे. भारताचे तरुण वैज्ञानिक जगाला नवीन ऊर्जा स्रोत आणि वैद्यकीय उपचार शोधण्यात मदत करतील, असे संकेत त्यांच्या भाकितांतून मिळतात.

असे मानले जाते की बाबा वेंगा यांची ८५% भाकिते आतापर्यंत खरी ठरली आहेत (उदा. ९/११ हल्ला, त्सुनामी, ओबामांचे राष्ट्राध्यक्ष होणे). मात्र, त्यांची भाकिते सांकेतिक भाषेत असल्याने त्यांचे अनेक प्रकारे अर्थ काढले जातात. बाबा वेंगा यांनी जरी अनेक संकटांचा इशारा दिला असला, तरी त्यांच्या भाकितांचा गाभा हा मानवाची जिद्द आणि विज्ञानाची प्रगती हाच आहे. संकटांनंतर शेवटी विजय मानवतेचा आणि प्रगतीचाच होईल, हाच संदेश त्यांच्या सकारात्मक भाकितांतून मिळतो, त्यामुळे नवे वर्ष २०२६(?New year 2026) कडे सकारात्मकतेने बघायला हरकत नाही!