Adhik Maas Amavasya 2023: अधिक श्रावण अमावस्येला महादेवाला 'या' पाच गोष्टी अर्पण करा; पितृदोषातून मुक्ती मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 04:31 PM2023-08-11T16:31:04+5:302023-08-11T16:35:30+5:30

Adhik Maas Amavasya 2023: दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास यंदा श्रावणाच्या आधी आला, त्याची सांगता बुधवारी १६ ऑगस्ट रोजी होणार आहे. जसे अधिक मासाला महत्त्व असते तसे अधिक मासाच्या अमावस्येलाही महत्त्व आहे. या शुभ तिथीला शिवलिंगावर दिलेल्या गोष्टी अर्पण केल्यास पितृदोषासह जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे.

१६ ऑगस्ट, बुधवार, पुरुषोत्तम महिन्याची अमावस्या आहे. अमावस्या तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे कारण ही तिथी पूर्वजांना समर्पित आहे. मलमासातील अमावस्या तिथीला पितरांना तर्पण आणि गरिबांना दान केल्याने विशेष फळ प्राप्त होते. या दिवशी भगवान शंकराची विधिवत पूजा केल्याने ग्रह-नक्षत्रांचा अशुभ प्रभाव आणि पितृदोष समाप्त होतो. जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो, असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. चला जाणून घेऊया पुरुषोत्तमी अमावस्येला शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात...

अमावस्येच्या तिथीला सूर्यास्ताच्या वेळी शिवलिंगावर मध आणि पांढरे तीळ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने पितृदोष दूर होतो आणि आरोग्य सुधारते. तसेच ऐश्वर्य, संपत्तीही प्राप्त होते. समाजात कीर्ती आणि सन्मान वाढतो. असे मानले जाते की असे केल्याने सर्व पाप नष्ट होते आणि पितृदोषाचे निवारण होते. त्यासाठी ही उपासना मनोभावे करावी.

पुरुषोत्तमी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर चांदीचा नाग आणि पाणी आणि बेलपत्र अर्पण करावे. असे केल्याने सर्प दोषासह पितृदोष संपतो आणि पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो. असे मानले जाते की चांदीचा नाग अर्पण केल्याने सुख, समृद्धी आणि संपत्तीचा मार्गही बनतो.

अधिक मासातील अमावस्येच्या निमित्ताने चांदीचा सर्प गरजू व्यक्तीला दान करावा किंवा सर्पाची रक्कम दान करावी. अधिक मासात दानाला अधिक महत्त्व असते. असे केल्याने सर्प तसेच पितृ दोषाचे निवारण होते. मानसिक आणि शारीरिक समस्या दूर राहतात आणि ग्रहांचा शुभ प्रभावही मिळतो. तसेच भगवान शंकराच्या कृपेने जीवनातील सर्व संकटे दूर होतात.

अधिक श्रावण अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करणे खूप लाभदायक मानले जाते. असे केल्याने पितृ दोष दूर होतात आणि सांसारिक सुखांची प्राप्ती होते. शिवलिंगावर उसाचा रस पळी पळीने अर्पण करताना 'ओम नमः शिवाय' मंत्राचा जप करत राहा. त्याचा लाभ म्हणून आर्थिक संकट दूर होऊन जीवनात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे.

अधिक श्रावण अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास १०८ बेलपत्रावर पांढर्‍या चंदनाने राम लिहून ते बेलपत्र शिवलिंगावर वाहताना 'ओम नमः शिवाय' मंत्राचा उच्चार करा. १०८ बेलपत्र शक्य नसेल तर ११ बेलपत्र देखील वाहू शकता. असे केल्याने ग्रह दोष दूर होतात आणि पितृदोषही दूर होतात. हा उपाय पंचमी तिथी, त्रयोदशी तिथी आणि चतुर्दशी तिथीलाही केला जाऊ शकतो.