कबरस्तानकडे जाण्यास रस्ताच नाही; मृतदेह मुख्य रस्त्यावर ठेवून मुस्लिम बांधवांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 18:37 IST2025-05-30T18:37:42+5:302025-05-30T18:37:56+5:30
गावातील मुस्लिम कबरस्तानकडे जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्याने मृतदेह थेट मुख्य रस्त्यावर ठेवत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

कबरस्तानकडे जाण्यास रस्ताच नाही; मृतदेह मुख्य रस्त्यावर ठेवून मुस्लिम बांधवांचे आंदोलन
- विठ्ठल भिसे
पाथरी ( जि. परभणी): "कबरस्तानकडे जाण्यासाठी रस्ताच नसेल तर अंत्यविधी कसा करायचा?" असा संतप्त सवाल उपस्थित करत पाथरी तालुक्यातील रेणापूर गावातील मुस्लिम बांधवांनी मृतदेहास रस्त्यावर ठेवून निषेध आंदोलन छेडले. गावातील मुस्लिम कबरस्तानकडे जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्याने मृतदेह थेट मुख्य रस्त्यावर ठेवत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हा प्रकार ३० मे रोजी दुपारी घडला.
पाथरी तालुक्यातील रेणापूर गावातील पाटीपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर मुस्लिम समाजाचा कबरस्तान आहे. मात्र, तेथे जाण्यासाठी सध्या केवळ पाऊल वाट असून, पक्का रस्ता नाही. या रस्त्याच्या मागणीसाठी समाजबांधव गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत, मात्र प्रशासनाने अद्याप गांभीर्याने दखल घेतलेली नव्हती.
दरम्यान, 30 मे रोजी गावात एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी कबरस्तानात नेण्यासाठी मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे वाटेवर चिखल व दलदल झाल्याने मृतदेह कबरस्तानात नेणे अशक्य झाले. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह मुख्य रस्त्यावर ठेवत निषेध नोंदवला. तहसीलदार येईपर्यंत मृतदेह हटवणार नाही असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. तसेच "जर तहसीलदार आले नाहीत, तर मृतदेह थेट तहसील कार्यालयासमोर नेण्यात येईल, असा इशाराही दिला.
घटनेची माहिती मिळताच गावचे उपसरपंच तथा शिवसेनेचे शेतकरी सेना जिल्हा प्रमुख विक्रम गायकवाड यांनी तहसीलदार एस. एन. हांदेश्वार यांना तातडीने संपर्क साधून संपूर्ण प्रकार कळवला. घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदार हांदेश्वार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाहणी करून आठ दिवसांत रस्त्याचा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन दिले. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत मृतावर अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली.
कबरस्थानकडे जाण्यास रस्ता नाही. अनेकवेळा पाठपुरावा केला. मात्र प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे शेवटी टोकाचे पाऊल उचलावे लागले.
- विक्रम गायकवाड, उपसरपंच, ग्रा प रेणापूर ता पाथरी