सोमनाथच्या मृत्यूची वस्तुस्थिती सरकारपर्यंत पोहचविणार; शरद पवारांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 17:44 IST2024-12-21T17:43:53+5:302024-12-21T17:44:12+5:30
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत शरद पवार यांनी केली दोषींवर कारवाईची मागणी

सोमनाथच्या मृत्यूची वस्तुस्थिती सरकारपर्यंत पोहचविणार; शरद पवारांचे आश्वासन
परभणी: सोमनाथ यांच्या मृत्यूप्रकरणी वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी मी इथे आलो आहे. शांततेत आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोमनाथ सुर्यवंशी यांना मारहाण करणे योग्य नव्हते. त्यामुळे सोमनाथच्या मृत्यू प्रकरणाची वस्तुस्थिती सरकारपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आमची असल्याचे मत खासदार शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी शनिवारी शहरातील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबना ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच सोमनाथ सूर्यवंशी या मृत झालेल्या युवकाच्या कुटुंबाला भेट दिली. त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
पत्रकार परिषदेत खा. शरद पवार म्हणाले, संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबनेचा प्रकार समोर आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांबरोबर सोमनाथ सूर्यवंशी देखील रस्त्यावर उतरला होता. मात्र पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून त्यास ताब्यात घेतले. सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू होईपर्यंत शिक्षा देणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. घडलेला प्रकार फारच गंभीर असून दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी घटनेची वस्तुस्थिती जाणून राज्य सरकारपर्यंत पोहचविणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी खासदार फौजिया खान, खा. निलेश लंके, खा. बजरंग सोनवणे, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी मंत्री राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे,माजी आ. विजय भांबळे, भीमराव हतीअंबिरे, संतोष देशमुख आदींची यावेळी उपस्थित होती.
भेटी देण्यापेक्षा, कारवाई करावी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील शनिवारी परभणी दौऱ्यावर येऊन सोमनाथच्या कुटुंबांची भेट घेणार असल्याचे पत्रकारांनी खा. शरद पवार यांना विचारले. सत्ताधाऱ्यांनी भेटी देणे चांगले असले तरीही केवळ भेटी न देता घडलेल्या घटनेतील दोषींवर कडक कार्यवाही करून चांगला संदेश द्यावा, असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीवर त्यांनी टोला लगावला.