एकाच बसवर १० गावच्या विद्यार्थ्यांची शाळा अवलंबून; ज्यादा बससाठी विद्यार्थ्यांनी केले ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 19:15 IST2021-02-11T19:15:10+5:302021-02-11T19:15:33+5:30
बसमध्ये जागा नसल्याने विद्यार्थ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी समर्थनगर जवळ बस रोखून धरत ठिय्या मांडला.

एकाच बसवर १० गावच्या विद्यार्थ्यांची शाळा अवलंबून; ज्यादा बससाठी विद्यार्थ्यांनी केले ठिय्या आंदोलन
पाथरी : पाथरी - सोनपेठ मार्गावरील दहा गावातील विद्यार्थ्यांना सकाळी शहरातील शाळेत जाण्यासाठी केवळ एकच बस उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने एकमेव बस गैरसोयीची होत आहे. या मार्गावर सकाळच्या वेळेत ज्यादा बस सोडावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी समर्थनगर येथे बस रोखून धरत ठिय्या दिला.
कोविड 19 च्या प्रादुर्भावानंतर बंद असलेल्या शाळा सुरू झाल्या आहेत. या काळात ऑनलाईन शिक्षण घेत घरात मोबाईलला चिटकून बसलेले विद्यार्थी आता शाळेत येऊ लागले आहेत. शाळेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात दाखल होण्याची संख्या मोठी आहे. शाळा नियमित सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. पाथरी - सोनपेठ रस्त्यावर आठ ते दहा गावे आहेत. येथील विद्यार्थ्यांना शहरातील शाळेत येण्यासाठी परळी -सिरसाळा - पाथरी ही एकमेव बस आहे. विटा गावापासून विद्यार्थी बसने प्रवास करतात. पुढे येईपर्यंत बस फुल होते. बाभळगाव, लोणी, टाकळगव्हान, समर्थनगर येईपर्यंत तर बसमध्ये उभे राहण्यास सुद्धा जागा राहत नाही. यामुळे या मार्गावर सकाळच्या वेळेत ज्यादा बस सोडावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी वारंवार महामंडळाकडे केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत्या. मात्र, बसमध्ये जागा नसल्याने विद्यार्थ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी समर्थनगर जवळ बस रोखून धरत ठिय्या मांडला. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रविंद धर्मे यांनी आगर प्रमुखांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, पाथरी आगाराने दुसरी बस पाठवल्यानंतर विद्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा मार्ग मोकळा झाला. विद्यार्थ्यांची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही. गैरसोय दूर झाली नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशारा धर्मे यांनी दिला आहे.