"त्याचं अपहरण झालंय!"; अफवेमुळे पालममध्ये खळबळ, पण पोलिसांनी २४ तासांतच लावला शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 18:31 IST2026-03-05T18:31:06+5:302026-03-05T18:31:42+5:30
पालममध्ये हायव्होल्टेज ड्रामा! बेपत्ता तरुणाचे सोलापूर कनेक्शन; पोलिसांच्या चपळाईमुळे टळला मोठा अनर्थ

"त्याचं अपहरण झालंय!"; अफवेमुळे पालममध्ये खळबळ, पण पोलिसांनी २४ तासांतच लावला शोध
पालम (जि. परभणी): पालम शहरातील बालाजी नगर भागातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. या तरुणाचे अपहरण झाल्याची अफवा शहरात पसरल्याने तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी चाणाक्षपणे तपास करत तरुणाला सोलापूरमधून सुखरूप ताब्यात घेतले.
अपहरणाच्या अफवेने वाढली धाकधूक
शेख इरफान शेख सलीम (२०) हा तरुण ३ मार्च रोजी नमाज पठणासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. तो वेळेत घरी न परतल्याने आणि त्याला रिक्षातून जबरदस्तीने नेल्याची अफवा पसरल्याने पालम पोलीस ठाण्यासमोर नातेवाईकांनी गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे यांनी तपासचक्र वेगाने फिरवले.
सोलापूरमध्ये लागला शोध
तांत्रिक मदतीद्वारे इरफानचे लोकेशन ट्रेस केले असता तो सोलापूरमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. उपनिरीक्षक प्रकाश लोखंडे आणि भरतसिंग ठाकूर यांच्या पथकाने सोलापूर रेल्वे स्टेशनजवळील मोदी चौकातून त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याचे अपहरण झाले नसून तो स्वतःहून गेल्याचे समोर आले. ५ मार्च रोजी पहाटे त्याला पालममध्ये आणून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.