देवाची यात्रा अन् गावात अंधार; आर्वीकरांनी परभणीत वीज ऑफिसच घेरलं, अधिकाऱ्यांची तारांबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 16:16 IST2026-03-28T16:15:41+5:302026-03-28T16:16:33+5:30
वीज पुरवठा खंडित झाल्याने आर्वीचा रथोत्सव धोक्यात; ग्रामस्थांचा अधीक्षक अभियंता कार्यालयात राडा.

देवाची यात्रा अन् गावात अंधार; आर्वीकरांनी परभणीत वीज ऑफिसच घेरलं, अधिकाऱ्यांची तारांबळ!
परभणी: तालुक्यातील आर्वी येथे पारंपरिक यात्रा महोत्सव अंधारात साजरा करण्याची वेळ आल्याने संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी परभणी येथील वीज वितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. किमान रथोत्सवाच्या दिवशी तरी वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी दोन तास आंदोलन करण्यात आले. अखेर अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांचा विरोध शांत झाला.
गेल्या काही दिवसांपासून वीज वितरण यंत्रणेचे लक्ष केवळ वसुलीकडे असून ग्रामीण भागातील दुरुस्तीची कामे प्रलंबित राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आर्वी येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात यात्रा व रथोत्सव साजरा होतो. या कालावधीत हजारो भाविक गावात दाखल होतात. मात्र यंदा महोत्सवादरम्यान वीजपुरवठा खंडित राहिल्याने धार्मिक कार्यक्रमांवर परिणाम झाला. शनिवारी दुपारी १२ वाजता आर्वीतील ग्रामस्थांनी परभणीतील अधीक्षक अभियंता कार्यालय गाठले. त्या ठिकाणी दोन तास ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. यावेळी अभियंता पवन सामाले यांनी हस्तक्षेप करत तीन तासांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत गावाकडे परतले. या आंदोलनात डी. एस. कदम, माऊली कदम, डॉ. गणेश हरकळ, आश्रोबा कदम, सिद्धू कदम, वैभव कदम, शिवाजी कदम, मुंजाभाऊ कदम, ज्ञानेश्वर हरकळ, संदीप जगताप, गोविंद दावलबाजे यांच्यासह ४० ग्रामस्थ सहभागी झाले होते.
वरिष्ठ अधिकारी म्हणे, फिल्डवर; ग्रामस्थांचा संताप
आंदोलनावेळी अधीक्षक अभियंता रुपेश टेंभुर्णे व कार्यकारी अभियंता गजेंद्र गाडेकर हे दोन्ही अधिकारी फिल्डवर असल्याचे समजताच ग्रामस्थांच्या संतापात भर पडली. कार्यालयात वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित असल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली. अखेर दूरध्वनीद्वारे वरिष्ठांशी संपर्क साधून सामाले यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
लाईनमन बदलण्याची मागणी
आर्वी गावासाठी नियुक्त लाईनमनकडून समाधानकारक सेवा मिळत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी त्यांची तत्काळ बदली करण्याची लेखी मागणी केली. वारंवार तक्रारी करूनही वीज दुरुस्तीचे प्रश्न अनेक दिवस प्रलंबित राहतात, असेही ग्रामस्थांनी नमूद केले.