परभणी : बालगोपाळांच्या दिंडीने शहर दुमदुमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:00 IST2018-07-24T00:59:08+5:302018-07-24T01:00:02+5:30
आषाढी एकादशीनिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सोमवारी शहरातून काढलेल्या बालगोपाळांच्या दिंडीत विविध शाळांमधील चिमुकले विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी झाले होते. ‘ज्ञानोबा तुकाराम’चा जयघोष करीत निघालेल्या दिंडीने शहर दुमदुमून गेले.

परभणी : बालगोपाळांच्या दिंडीने शहर दुमदुमले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: आषाढी एकादशीनिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सोमवारी शहरातून काढलेल्या बालगोपाळांच्या दिंडीत विविध शाळांमधील चिमुकले विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी झाले होते. ‘ज्ञानोबा तुकाराम’चा जयघोष करीत निघालेल्या दिंडीने शहर दुमदुमून गेले.
आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी शहरातून बालगोपाळांची दिंडी काढली जाते. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास माळीगल्लीतील विठ्ठल मंदिरात माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी विश्वहिंदू परिषदेचे प्रांतमंत्री अनंत पांडे, पत्रकार विजय जोशी, संतोष धारासूरकर, विहिंपचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शहाणे, प्रल्हादराव कानडे, सुनील रामपूरकर, शिवप्रसाद कोरे, अभिजीत कुलकर्णी, गोपाळ रोडे आदींची उपस्थिती होती. या ठिकाणाहून बालगोपाळांच्या दिंडीला प्रारंभ झाला. नारायणचाळ, गांधीपार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौकमार्गे विद्यानगरापर्यंत ही दिंडी काढण्यात आली. दिंडीत शहरातील १२ शाळांमधील सुमारे २ हजार ८०० विद्यार्थी सहभागी झाल होते. वासवी वनिता क्लबच्या वतीनेही दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी रुपा कत्रुवार, अनघा वट्टमवार, अंजली मुक्कावार व पदाधिकारी उपस्थित होते. बाल चिमुकल्यांनी विठ्ठल, रुख्मिणीसह विविध संतांचे सजीव देखावे सादर केले. टाळ-मृदंगाचा गजर करीत हरिनामाचा जयघोष करीत निघालेल्या या दिंडीचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.