धक्कादायक! रस्ता सोडून बस पुलाखाली उतरली; चालक नशेत असल्याचा प्रवाशांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 17:53 IST2026-02-14T17:48:11+5:302026-02-14T17:53:36+5:30
दैव बलवत्तर ठरल्याने जीवितहानी झाली नसल्याचे मसला ग्रामस्थांनी सांगितले.

धक्कादायक! रस्ता सोडून बस पुलाखाली उतरली; चालक नशेत असल्याचा प्रवाशांचा आरोप
गंगाखेड (जि. परभणी) : तालुक्यातील मसला येथून प्रवासी घेऊन गंगाखेडकडे येणारी एसटी महामंडळाची बस रस्ता सोडून खराडी पुलाखाली उतरल्याने दहा प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास मसला गावाजवळ घडली.
गंगाखेड तालुक्यातील मसला येथून गंगाखेडकडे प्रवासी घेऊन येणारी बस क्रमांक (एमएच ०६ एस ८५५७) ही गुरुवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास मसला येथून गंगाखेडकडे निघाली असता गावापासून पुढे काही अंतरावर येताच ही बस गावाजवळ असलेल्या खराडी पुलावरून ओढ्यात उतरली. अपघातात बसमध्ये चालकाच्या शेजारील आसनावर बसलेला सारंग मारोती पांचाळ (१२) हा समोरील काच फुटून बस बाहेर फेकल्या गेला तर मेघा मारोती पांचाळ (३९), मारोती प्रल्हाद पांचाळ (५०), ऋतुराज तुकाराम पांचाळ (१५, सर्व रा. मसला ह.मु. पुणे), अंजली दत्तात्रय चौगुले (३४), धीरज दत्तराम चौगुले (२०, रा.पुणे), मंगलबाई मारोतराव शिंदे (६०), राधाबाई बन्सी शिंदे (५०), आराध्या माधव शिंदे (३), विठ्ठल हरिदास नागणे (३२, रा. मसला) हे प्रवासी जखमी झाले आहेत.
बसचा अपघात झाल्याची माहिती समजताच ईश्वर शिंदे, माधव शिंदे, गुणवंत ढगे, पांडुरंग शिंदे, प्रकाश शिंदे, शिवाजीराव शिंदे, बालासाहेब शिंदे, आप्पाराव कदम, प्रकाश शिंदे, वैजनाथ शिंदे, आदीनाथ शिंदे, मारोतराव शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून ऑटो व दोन खासगी वाहनातून गंगाखेडकडे आणले. १०८ रुग्णवाहिकेचे चालक विष्णू व्होरे यांनी झोला पाटी येथून तिघांना ऑटोतून रुग्णवाहिकेत घेत सर्व जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी मुंढे, परिचारिका प्रणिता शिंदे, सुमेधा नागरगोजे आदींनी जखमींवर उपचार केले. मरडसगाव जि.प. गटाच्या नवनिर्वाचित सदस्य शिल्पा पाटील यांचे प्रतिनिधी प्रणित खजे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जखमी प्रवाशांना मदत केली.
बसचालक दारूच्या नशेत असल्याचा प्रवाशांचा आरोप
मसला येथून गंगाखेडकडे येणाऱ्या बसचा चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप बसमधील प्रवाशांनी केला असून दैव बलवत्तर ठरल्याने जीवितहानी झाली नसल्याचे मसला ग्रामस्थांनी सांगितले.