परभणीत प्रवाशांनी भरलेल्या धावत्या रिक्षाने अचानक घेतला पेट; डोळ्यादेखत रिक्षाचा कोळसा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:10 IST2026-04-01T12:08:56+5:302026-04-01T12:10:02+5:30
वसमत राष्ट्रीय महामार्गावर धावत्या रिक्षाला भीषण आग; वसंतराव नाईक पुतळा परिसरात खळबळ.

परभणीत प्रवाशांनी भरलेल्या धावत्या रिक्षाने अचानक घेतला पेट; डोळ्यादेखत रिक्षाचा कोळसा!
परभणी: परभणी शहरातील वसमत राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी आगीचा एक भीषण थरार पाहायला मिळाला. सकाळी ११:१५ वाजेच्या सुमारास प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका चालत्या ऑटोरिक्षाला अचानक आग लागली. आगीचा भडका उडण्यापूर्वीच प्रवासी आणि चालक रिक्षातून बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, या आगीत संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली आहे.
ही घटना वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरात घडली असून, यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
डोळ्यादेखत रिक्षाचा कोळसा
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा प्रवाशांना घेऊन जात असताना अचानक इंजिनमधून धूर निघू लागला. प्रसंगावधान राखून चालक आणि प्रवाशांनी तात्काळ खाली उड्या घेतल्या. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण रिक्षा आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाली. ही आग इतकी भीषण होती की परिसरात धुराचे लोट पसरले होते. भररस्त्यात रिक्षा जळत असल्याचे पाहून वाहनधारकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पोलीस प्रशासनाची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्यासह वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत जळणारी रिक्षा बाजूला केली आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
वाहतुकीचा खोळंबा आणि नागरिकांची गर्दी
या आगीच्या घटनेमुळे वसमत राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या दुहेरी रांगा लागल्या होत्या. आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही मदतीचा हात पुढे केला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वाहनांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.