केंद्र शासनाच्या वतीने १९ नोव्हेंबर २०१६ पासून ‘सर्वांसाठी घरे’ या धोरणांतर्गत राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेची २० नोव्हेंबर २०१६ पासून अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार २० नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय आवास दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या योजनेंतर्गत ग्रामीण योजनांच्या गतिमानतेसाठी व गुणवत्तावाढीसाठी राज्यात ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ हा उपक्रम १९ नोव्हेंबर २०२० पासून सुरू करण्यात आला. ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत शासकीय यंत्रणेबरोबरच, सर्व पंचायतराज संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, खासगी संस्था, तंत्रशिक्षण संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थ यांचा सक्रियपणे सहभाग वाढविणे तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे, गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांची क्षमता बांधणी व जनजागृतीद्वारे लोकचळवळ उभी करणे, हा या अभियानाचा उद्देश होता. या अनुषंगाने विभाग, जिल्हा, तालुका, स्तरावर आणि ग्रामपातळीवरही कार्यशाळेचे १८ डिसेंबर २०२० पर्यंत आयोजन करण्यात आले होते. हे अभियान राबविण्यास २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर त्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता सद्य:स्थितीत निर्माण झालेली कोरोना परिस्थिती पाहता या अभियानास ५ जूनपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या अंतर्गत प्रलंबित राहणाऱ्या या घरकुलांच्या कामांना वेग येणार आहे.
ग्रामीण महाआवास अभियानास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:18 AM