टोकियो - भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी (Deepika Kumari ) हिने आज टोकियो ऑलिम्पिकमधील महिला एकेरी गटात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दीपिका कुमारी हिने माजी विश्वविजेती रशियन ऑलिम्पिक समितीची तिरंदाज सेनिया पेरोव्हा हिचा रोमांचक शुटआऊटमध्ये पराभव करत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत पाच सेटनंतर दोन्ही तिरंदाजांमध्ये ५-५ अशी बरोबरी होती. त्यानंतर दीपिकाने या दबावाचा यशस्वीपणे सामना करत शूटऑफमध्ये परफेक्ट १० स्कोअर केला आणि रियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदत विजेतीचे आव्हान परतवून लावले. (Deepika Kumari makes history, reaches Archery quarter finals with thrilling victory)
एका निशाण्यावर निर्णय होणाऱ्या शूटऑफमध्ये रशियन तिरंदाज पेरोव्हा ही दबावाखाली दिसली. तिला केवळ ७ गुण मिळवता आले. तर दीपिकाने परफेक्ट १० स्कोअर करत पेरोव्हा हिला ६-५ अशा फरकाने पराभूत केले. यी विजयासह ऑलिम्पिक तिरंदाजीमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणारी भारताची पहिली तिरंदाज ठरली आहे. आता तिचा पुढील सामना आजच होणार आहे. दरम्यान, भारताचा अजून एक तिरंदाज अतनू दास यानेही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाआहे. गुरुवारी झालेल्या अत्यंत रोमहर्षक लढतीत अतनू दास याने दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन असलेल्या दक्षिण कोरियाच्या ओ जिन्होक याचा पराभव केला होता.
आता पुढच्या फेरीत अतनू दासचा सामना हा जापानच्या ताकाहारू फुरुकावा याच्याशी होईल. तो लंडन ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत आहे. तसेच फुरुकावा तिरंदाजीच्या सांघिक गटात कांस्यपदक जिंकणाऱ्या जपानच्या संघाचाही सदस्य होता. अतनू दास आणि दीपिका कुमारी हे पती-पत्नीअसून त्यांनी गतवर्षी विवाह केला होता. आज झालेल्या दीपिकाच्या लढतीवेळी तिला प्रोत्साहन देण्यासाठी अतनू दास उपस्थित होता.