युद्धामुळे मोडलं भारताचं वर्ल्डकपचं स्वप्न; अमेरिका-इराण तणावामुळे खेळाडूंना फटका, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 11:33 IST2026-03-08T11:31:18+5:302026-03-08T11:33:44+5:30
अचानक वाढलेल्या तणावामुळे आणि मध्य पूर्वेतील युद्ध परिस्थितीमुळे पासपोर्ट वेळेवर भारतात पाठवता आले नाहीत.

युद्धामुळे मोडलं भारताचं वर्ल्डकपचं स्वप्न; अमेरिका-इराण तणावामुळे खेळाडूंना फटका, काय घडलं?
नवी दिल्ली - एकीकडे सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट टीम टी-२० वर्ल्डकप ट्रॉफीपासून एक पाऊल दूर आहे तर दुसरीकडे भारताच्या बॉक्सिंग टीमचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न मोडले आहे. भारतीय ज्युनिअर बॉक्सिंग टीमला मजबुरीने वर्ल्डकपपासून दूर व्हावे लागत आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे लॉजिस्टिकचा सामना करावा लागत असल्याने ही वेळ आली आहे.
रिपोर्टनुसार, १० सदस्य असणारी भारतीय ज्युनिअर बॉक्सिंग टीम मॉन्टेनेग्रोच्या बुडवा शहरात ३ ते ११ मार्चपर्यंत होणाऱ्या वर्ल्ड बॉक्सिंगमध्ये सहभागी होणार होती. परंतु आवश्यक कागदपत्रे वेळेवर न मिळाल्याने टीम टूर्नामेंटमध्ये पोहचू शकली नाही. मॉन्टेनेग्रोचे भारतात दूतावास नाही. त्यामुळे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (BFI) ने UAE मधील मॉन्टेनेग्रो दूतावासाद्वारे खेळाडूंच्या व्हिसासाठी अर्ज केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिसा स्टॅम्पिंगसाठी फिजिकल पासपोर्ट जमा करणे आवश्यक होते. त्यामुळे पाच मुले आणि पाच मुलींसह सर्व खेळाडूंचे पासपोर्ट UAE ला पाठवण्यात आले. सामान्यतः व्हिसा स्टॅम्पिंगनंतर दोन ते तीन दिवसांत पासपोर्ट परत केले जातात.
युद्धामुळे पासपोर्ट वेळेवर पोहोचले नाहीत
मात्र युद्धामुळे यावेळची परिस्थिती वेगळी होती. अचानक वाढलेल्या तणावामुळे आणि मध्य पूर्वेतील युद्ध परिस्थितीमुळे पासपोर्ट वेळेवर भारतात पाठवता आले नाहीत. ईमेलद्वारे व्हिसा आधीच निश्चित करण्यात आला होता, परंतु प्रत्यक्ष पासपोर्ट भारतात पोहोचले नाहीत. परिणामी भारतीय संघ मॉन्टेनेग्रोला जाऊ शकला नाही आणि त्यांना स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.
२० फेब्रुवारी रोजी पासपोर्ट जमा केले होते
२० फेब्रुवारी रोजी व्हिसा स्टॅम्पिंगसाठी खेळाडूंचे पासपोर्ट सादर करण्यात आले आणि संघाचे विमान तिकिटे स्टँडबायवर ठेवण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात बीएफआय मॉन्टेनेग्रिन अधिकाऱ्यांशी आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी (एमईए) सतत संपर्कात राहिला, परंतु पासपोर्ट वेळेवर परत मिळू शकले नाहीत. अशा प्रकारे भारताच्या १० सदस्यीय युवा बॉक्सिंग संघाचे विश्वचषकात सहभागी होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.