लाहोर : बीसीसीआय सरकारच्या इशाऱ्यांवर चालणारे बोर्ड असून, राज्यकर्त्यांच्या परवानगीनंतरच भारतीय क्रिकेटचे सर्व निर्णय घेतले जात असल्याची टीका पाकचा माजी कर्णधार जावेद मियॉँदाद याने केली आहे.भारत- पाकदरम्यान द्विपक्षीय मालिका पूर्ववत करण्यासंदर्भात बीसीसीआयने घेतलेल्या भूमिकेवर मियॉँदाद नाराज आहेत. बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांच्या अलीकडच्या वक्तव्याचा संदर्भ देत मियॉँदाद म्हणाले, की बीसीसीआय सरकारच्या इशाऱ्यावर नाचते. खरेतर याला क्रिकेट बोर्ड नव्हे, सरकारी बोर्ड संबोधायला हवे. अन्य क्रिकेट बोर्डांसोबत भारताची वागणूक खराब आहे. ही बीसीसीआयच्या पतनाची सुरुवात आहे. पीसीबी प्रमुख शहरयार खान अलीकडेच भारत दौऱ्यावर आले. त्यांना बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यासोबत मालिकेसंदर्भात चर्चा करायची होती, पण शिवसैनिकांनी राडा केल्याने त्यांना आल्या पावली परतावे लागले. नंतर सद्य:स्थितीत मालिका आयोजन होणे नाही, असे वक्तव्य अनुराग ठाकूर यांनी केले. ५८ वर्षांच्या मियॉँदादने भारत, आॅस्ट्रेलिया, इंग्लंड या देशांनी जागतिक क्रिकेटवर प्रभुत्व गाजविल्याबद्दल टीका केली. इंग्लंड- आॅस्ट्रेलियात सातत्याने अॅशेसचे आयोजन होते, तर भारत- पाक मालिका का होऊ नये, पाकसोबत पराभवाच्या भीतीमुळेच भारत खेळत नसल्याचा आरोपही मियॉँदादने केला.(वृत्तसंस्था)
सरकारच्या इशाऱ्यावर नाचते बीसीसीआय
By admin | Published: October 28, 2015 10:25 PM