मोबाइल चोरीचा आरोप दोघांच्या जिव्हारी! एका मुलाचे टोकाचे पाऊल; दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 06:08 IST2026-03-23T06:07:57+5:302026-03-23T06:08:03+5:30
शाळेत झालेल्या मोबाइल चोरीच्या आरोपावरून दोन अल्पवयीन मुलांनी टोकाचे पाऊल उचलले.

मोबाइल चोरीचा आरोप दोघांच्या जिव्हारी! एका मुलाचे टोकाचे पाऊल; दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : शाळेत झालेल्या मोबाइल चोरीच्या आरोपावरून दोन अल्पवयीन मुलांनी शुक्रवारी, (दि.२०मार्च) टोकाचे पाऊल उचलले. त्यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र, पालकांची तक्रार नसल्याने याप्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.
घणसोलीतील एका खासगी शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकलवेळी काही विद्यार्थ्यांचे मोबाइल वर्गाबाहेर ठेवले होते. ते चोरीला गेल्याची त्यांची तक्रार होती. त्यावरून शिक्षिकेने विद्यार्थ्यांची दप्तरे तपासली असता तीन मुलांकडे ते सापडले, असे समजते. त्यावरून शिक्षिकेने सर्वांसमोर त्या तिघांवर चोरीचा आरोप करून पोलिसांकडे तक्रार करण्याचा दम भरला.
या प्रकारानंतर शाळेने त्या तिन्ही विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास मनाई केली आणि त्यांना केवळ परीक्षेलाच पाठविण्याच्या सूचना पालकांना केल्या. त्यामुळे मुलांनी बदनामीचा धसका घेतला होता. मोबाइल चोरीचा आरोप आणि शिक्षिकेची कथित धमकी यामुळे दोन विद्यार्थ्यांनी आपल्या धरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात एकाचा मृत्यू झाला.
शाळेत नेमके काय घडले?
मुलांसोबत शाळेत नेमकं काय घडलं? पालक दबावाखाली आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी रबाळे परिसरातील एका विद्यार्थ्याने कॉपीच्या आरोपावरून आत्महत्या केली होती. त्यामुळे शाळांमध्ये घडणारे प्रकार मुलांच्या जिव्हारी लागत असल्याचेही स्पष्ट होत आहे.
शाळेत फोन आणले कसे?
चोरीचा आरोप मुलांवर झाला ते मोबाइल इतर विद्यार्थ्यांचे होते, असे समजते. त्यामुळे शाळेत अल्पवयीन मुलांना मोबाइल घेऊन येण्याची अनुमती कशी मिळाली? हादेखील प्रश्न उपस्थित होत आहे.